ता. 28, माहे एप्रिल, सन 1960
पानशेतची कमजोर मोरी प्रमेय सिद्ध करणारे निवेदन इंजि. जोशी देणार
पुणे, दि. 27 – इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या मुंबई शाखेचे सदस्य श्री. एस. बी. जोशी यांची न्या. नाईक मंडळापुढील उलटतपासणी आज पुढे चालू राहिली. ती बहुधा उद्या पूर्ण होईल. मुळा डॅम डिव्हिजनचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. के. आर. दाते यांनी आज श्री. जोशी यांना बरेच प्रश्न विचारले. आज श्री. जोशी यांना मुख्यत्वे धरण बांधणीमधील तात्त्विक सिद्धांताचा आणि तद्नुषंगिक माहिती विचारली गेली, तिचा उद्देश पानशेत धरण हे कॉंड्युईटची कमान कमजोर होऊन दडून मग फुटले अशा त्यांनी मांडलेल्या मताबद्दल हे प्रश्न होते.
श्री. जोशी यांनी सांगितले की, त्यांचे मत ज्या ग्रहित प्रमेयावर आधारलेले आहे त्यांची संकल्पित माहिती ते लेखी सादर करतील. श्री. जोशी यांची उलटतपासणी संपविण्यासाठी उद्या शनिवारीसुद्धा नाईक चौकशी मंडळाचे कामकाज चालणार आहे.
टाटा व महिंद्र यांचा मुंबईत ट्रॅक्टर कारखाना होणार डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर्स
मुंबई – जीप मोटारीचे उत्पादक मेसर्स महिंद्र कंपनी, टाटाची व्होल्टास कंपनी आणि अमेरिकेतील शिकागो येथील इंटरनॅशनल हार्वेस्टर कंपनी यांनी भारतात डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर्स तयार करण्याचा कारखाना उभारण्याचे ठरविले आहे, असे श्री. के. महिंद्र यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या कामासाठी चार कोटी रुपयांचे भांडवल लाणार असून, एक कोटी जमाही केले आहे. हा कारखाना मुंबईत उभारण्यात येईल व सालिन साडेतीन हजार ट्रॅक्टर्स तयार होतील. याशिवाय ट्रॅक्टरना लागणाऱ्या सुट्या भागाचेही उत्पादन या कारखान्यात होईल. कारखान्यातील कामगारांची संख्या अडीच हजारांवर जाईल.