नवी दिल्ली, ता. 25 – पंतप्रधान पंडित नेहरू यांना आपण पेकिंग भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्यांनी आपल्या सोयीनुसार यावे असे आपण सांगितले आहे, असे चीनचे पंतप्रधान चाऊ यांनी निवेदन केले. आज रात्री चाऊंनी पत्रकारांना मुलाखत दिली. उभय पंतप्रधानांच्या संयुक्त पत्रकात म्हटल्याप्रमाणे अधिकाऱ्यांचे कार्याचा अहवाल पाहून आपण या प्रकरणी निर्णय घेऊ असे पंडितजी म्हणाल्याचेही चाऊंनी प्रकट केले.
ते म्हणाले, तथाकथित मॅकमोहन रेषा चीनला कधीच स्वीकारणीय नाही. तथापि त्या सरहद्दीवरील जैसे थे परिस्थिती मानण्याची आमची तयारी आहे. आम्ही ती रेषा ओलांडणार नाही. वाटाघाटीत आम्ही प्रादेशिक हक्कांचा आग्रह ठेवला नाही.
त्यामुळे पूर्व सरहद्दी संबंधीच्या वादाची तीव्रता कमी झाली आहे. पश्चिम सरहद्दीवर आमच्या अधिकार क्षेत्राचे भूमीत येऊ नका असे आम्ही सूचविले पण ते भारतीय नेत्यांनी सर्वस्वी मानले नाही.
जनतेने सद्भिरुचीचा विकास करणे जरूर
मुंबई – सौंदर्यसृष्टी नी सद्भिरुची याबाबत वाचकवर्ग जागृत राहील तर तो आजच्या लेखकवर्गावर फार मोठा परिणाम करू शकेल अशा आशयाचे मत महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. रा. श्री. जोग यांनी मुंबई मराठी साहित्य संघामध्ये एका भाषणात व्यक्त केले.
संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी साहित्यामध्ये औचित्य, सौजन्य, संयम व अभिरुची इत्यादी गुण आवश्यक असल्याचे सांगितले आहे व त्यांची ती मते आपणासही मान्य असल्याचे सांगून प्रा. जोग म्हणाले की, समाजामध्ये रुचिभिन्नता असणे हे अगदी स्वाभाविक असले तरीसुद्धा एकंदर व्यवहारामध्ये अभिरुचीची एकात्मकताच अधिक प्रमाणावर आढळून येते.
किंबहुना अशी एकात्मकता असल्यामुळे व्यवहार चालणे शक्य होते. अभिरुची म्हणजे विचारपूर्व काळातली एक प्रतिक्रिया असते. लेखकाच्या त्याचप्रमाणे वाचकाच्याही ठायी ती असते, असे विवेचनही प्रा. जोग यांनी केले.