सर्वसामान्य मोबाइल आणि इंटरनेट ग्राहकांसाठी 5जी हे वायरलेस तंत्रज्ञानाचे पाचव्या पिढीचे माध्यम आहे. 5जीमुळे येणाऱ्या काळात काय बदल होईल, त्याबाबत…
केंद्रीय रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच आयआयटी, मद्रासने देशी तंत्रज्ञानाने तयार केलेल्या एका ट्रायल नेटवर्कवरून देशातील पहिला फाइव्ह-जी कॉल केला. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी, मद्रास येथे भारतातील पहिल्या फाइव्ह-जी टेस्ट बॅंडचे उद्घाटन केले होते. स्टार्टअप्स आणि उद्योजक यांना स्थानिक पातळीवर आपल्या उत्पादनांची चाचणी घेणे शक्य व्हावे आणि परदेशी उत्पादनांवरील आपले अवलंबित्व कमी व्हावे, असा या बॅंडचा उद्देश आहे. अर्थातच, फाइव्ह-जीची तयार उपकरणे आणि नेटवर्क यांच्यासाठी आता परदेशातून मंजुरी घेण्याची गरज नाही. देशातच त्याचे प्रमाणीकरण केंद्र आहे आणि फाइव्ह-जी नेटवर्कच्या शर्यतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भारतीय कंपन्यांना त्याचा लाभ घेता येईल.
फाइव्ह-जी हे फोर-जीच्या तुलनेत अधिक वेग व क्षमता मोबाइलधारकांना प्रदान करेल. हे आतापर्यंतचे सर्वांत मजबूत आणि गतिमान तंत्रज्ञान आहे. फाइव्ह-जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग आणखी वाढेल. त्यामुळे डाउनलोडिंगला कमी वेळ लागेल. यात वेब पेज लोड करण्यासाठी कमी वेळ लागेल आणि आपले जीवन, व्यवसाय आणि काम करण्याच्या पद्धती सर्वकाही बदलून जाईल. फाइव्ह-जी आल्यानंतर आपले तंत्रज्ञान सर्व वस्तूंना एकमेकांशी जोडेल. घर, चालकविरहित कार, स्मार्ट ऑफिस, स्मार्ट सिटी आणि उन्नत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी परस्परांशी जोडल्या जातील. अनेक अर्थांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने जे अशक्य आणि उन्नत बदल आपण इच्छितो, ते सर्व फाइव्ह-जी नेटवर्कमुळे शक्य होतील.
गेल्या सुमारे 30 वर्षांमध्ये वायरलेस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरेच रूपांतरण झाले आहे. वन-जीच्या सुरुवातीच्या दिवसांत जो ऍनलॉग सेल्युलर होता आणि केवळ आवाज इकडून तिकडे पोहोचविणे, हाच ज्याचा प्राधान्यक्रम होता त्याचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही केबलचा वापर न करता आवाज दुसरीकडे पोहोचत होता. हे नेटवर्क बरेच दिवस तसेच राहिले. नंतर टू-जी नेटवर्क आले. आवाजाबरोबरच काही आकडेही या नेटवर्कच्या माध्यमातून इकडून तिकडे जाऊ शकत असत. म्हणजेच टू-जी नेटवर्कमध्ये संभाषणाच्या बरोबरीने एसएमएसचीही सुविधा होती. त्यानंतर थ्री-जी आणि फोर-जी नेटवर्क आली. हे फोन अद्याप वापरात आहेत. हे मोबाइलमधील एक मोठे रूपांतरण होते आणि याद्वारे फोटो आणि व्हिडिओ पाठवणे, डाउनलोड करणे शक्य झाले होते. त्याचबरोबर मोबाइलमध्ये विविध ऍप्स या काळात निर्माण झाली आणि त्यांनी आपले जगच बदलून टाकले.
फाइव्ह-जी तंत्रज्ञानही ग्राहकांना बरेच काही नवे देणार आहे. अर्थात, फाइव्ह-जीचे तंत्रज्ञान आणि त्याचा अनुभव यात फरक आहे. उदाहरणार्थ, काही देशांत फाइव्ह-जी तंत्रज्ञान आधीपासूनच कार्यरत आहे. परंतु त्या देशांमध्ये, अगदी अमेरिकेतसुद्धा फाइव्ह-जीमुळे अपेक्षित असलेले बदल अद्याप घडून आलेले नाहीत. फाइव्ह-जी नेटवर्क फोर-जीच्या तुलनेत खूपच गतिमान आहे हे खरे, परंतु फाइव्ह-जीमुळे लोकांच्या जीवनमानात होणाऱ्या बदलांची अद्याप प्रतीक्षाच केली जात आहे. आव्हाने येथेच संपत नाहीत. उदाहरणार्थ, फाइव्ह जी नेटवर्क केवळ येऊन उपयोग नाही तर आपल्याकडे खास त्या तंत्रज्ञानाला साजेसा मोबाइल असणेही गरजेचे आहे. अर्थातच, यामुळे बाजारात फाइव्ह-जी तंत्रज्ञान असलेले असंख्य मोबाइल येतील आणि ग्राहकांना त्यांची अव्वाच्या सव्वा किंमतही मोजावी लागेल.
आपल्याच देशाबद्दल बोलायचे झाल्यास, फाइव्ह-जी स्पेक्ट्रममध्ये संचालित होण्यासाठी फाइव्ह-जी टेलिकॉम लायसेन्सच्या प्रक्रियेवर अद्याप काम सुरूच आहे. व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेल फाइव्ह-जी नेटवर्कच्या आपापल्या नेटवर्कची क्षमता अद्याप पारखून पाहत आहेत. या वर्षाअखेरीस काही महत्त्वाच्या शहरांमध्ये फाइव्ह-जी नेटवर्कचे आगमन होणार असले, तरी मानवी जीवनावरील त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दूरसंचार विभागाने असे स्पष्ट केले आहे की, या वर्षी फाइव्ह-जी नेटवर्क लॉंच होईल. परंतु सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ते कार्यान्वित केले जाणार आहे. त्यानंतर काही काळाने देशातील इतर रहिवाशांना या नेटवर्कचा लाभ घेणे शक्य होणार आहे. फाइव्ह-जी आणि त्यापाठोपाठ येत असलेले सिक्स-जी नेटवर्क भारतात अनेक बदल घडवून आणेल हे निश्चित. परंतु सर्वच लोकांना या नेटवर्कचा लाभ घेणे शक्य होणार नाही. ज्या उपकरणांमध्ये फाइव्ह-जी तंत्रज्ञानाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो, अशा उपकरणांपैकी बहुसंख्य उपकरणे भारतात तयार होतच नाहीत. म्हणजेच, अशा स्थितीत फाइव्ह-जी नेटवर्कवर चालणाऱ्या गॅजेट्ससाठी आपल्याला परदेशांवर अवलंबून राहावे लागणार. उदाहरणार्थ, ऍप स्टोअर आणि ऍपल स्टोअर अशा दोन्ही प्रमुख प्लॅटफॉर्मसाठी सॉफ्टवेअर विकसित करणे आणि त्याची चाचणी करण्यासाठी अनेक टेस्टिंग रूम्सची आवश्यकता असेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात, विशेषतः विमानतळ, रुग्णालये आणि डाटा संकलनात फाइव्ह-जी तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावेल, असे सांगितले जाते. वायरलेस तंत्रज्ञानाची पुढील पिढी केवळ फोनपर्यंत सीमित राहणार नाही. अशा स्थितीत, त्यास अनुसरून नेटवर्क, त्यानुरूप उपकरणे आणि त्यानुरूप ऍप्ससाठी खर्च करावा लागेल. भारताची विशाल लोकसंख्या आणि इंटरनेट तसेच डेटाविषयक मोठ्या गरजा लक्षात घेता, जागतिक दूरसंचार स्पर्धेत भारत निश्चित सहभागी आहे. टेलिकॉम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा जागतिक बाजार चुनिंदा देशांच्या निवडक कंपन्यांकडे एकवटलेला आहे.
भविष्यात भारत फाइव्ह-जी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांमध्ये अग्रणी असेल, याची शक्यता आहे; पण फाइव्ह-जी तंत्रज्ञानाचे विकासकेंद्र म्हणून भारत जागतिक बाजाराला आकर्षित करू शकेल की नाही, हे काळच ठरवेल. ज्या कंपन्या फाइव्ह-जी नेटवर्कची सेवा सुरू करणार आहेत, त्यांना पायाभूत संरचनेवरही खर्च करावा लागेल, जेणेकरून त्यांची सेवा संपूर्ण देशात एकसारखीच असावी आणि मोबाइल तसेच अन्य उपकरणे त्यावर व्यवस्थित चालावीत. या आव्हानांना आपण तोंड देऊ शकलो नाही, तर आपल्याकडे तंत्रज्ञान तर असेल; परंतु त्याचा वापर करणारे लोक जास्त नसतील.