Ambegaon Crime: आंबेगावातून ५९ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून सांगलीत खून; मृतदेह कालव्यात फेकला
Ambegaon Crime: चारचाकीतून नेऊन गोठ्यात मारहाण; पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न

पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातून ५९ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्यांना सांगली येथे नेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गोठ्यात अज्ञात वस्तूने डोक्यात व छातीवर मारहाण करून त्यांचा खून केल्यानंतर मृतदेह टेंभू कॅनालच्या वाहत्या पाण्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे नाव गोविंद माधवराव उपासे (वय ५९) असे आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा रोहित गोविंद उपासे (वय ३५, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास गोविंद उपासे यांना चारचाकी वाहनातून जबरदस्तीने नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सांगलीतील शामराव नगर परिसरातील एका गोठ्यात नेऊन अज्ञात वस्तूने डोक्यात आणि छातीवर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह टेंभू कॅनालच्या वाहत्या पाण्यात फेकून देण्यात आला.
या प्रकरणात वैभव केंगार, मोहिनी केंगार, राहुल एक बाबर (रा. सांगली) आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात भान्यासं कलम १०३(१), १४०(१), २३८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करीत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.





