पुणे – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी “मोक्का’ अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा वापर सुरू केला आहे. आता बल्लूसिंग टाक टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. गेल्या 11 महिन्यांतील ही
50 वी कारवाई ठरली आहे.
बल्लूसिंग टाक (रा. वानवडी), उजालासिंग टाक व पळून गेलेले सोमनाथ घारोळे, पिल्लूसिंग जुन्नी, जलसिंग दुधानी व गोरखसिंग टाक हे हत्यारासह पंचरत्न सोसायटीत दरोडा टाकून पळत होते. यावेळी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी टोळीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांवर धारदार हत्याराने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला केला होता. त्यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळीचा प्रमुख बल्लूसिंग टाक हा त्याच्या साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी चालवून सन 2008 पासून गंभीर गुन्हे करत असल्याचे उघड झाले.
बल्लूसिंगवर यापूर्वी कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता. त्यामुळे आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्यामार्फत “मोक्का’ कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.