नवी दिल्ली : जगभरामध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. भारतामध्ये कोरोनाचे 29 रुग्ण आढळले आहे. अशामध्ये इराणवरुन भारतात आलेल्या 495 प्रवाशांचा काहीच पत्ता नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयासमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या प्रवाशांनी आपल्या व्हिसावर जो पत्ता दिला आहे ते त्याठिकाणी उपलब्ध नाहीत. आरोग्य मंत्रालयाने पर्यटन मंत्रालयाला या इराणी प्रवाशांना शोधण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी याविषयी माहिती दिली. इराणवरुन आलेल्या अनेक प्रवाशांनी व्हिसा अर्जाच्या वेळी हॉटेलचे पत्ते दिले होते. या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम हॉटेलवर गेली. तेव्हा कळाले की ते प्रवासी त्याठिकाणी आलेच नव्हते. व्हिसा मिळाल्यानंतर त्यांनी बुकिंग रद्द केली. ज्यावेळी हे प्रवासी भारतात आले होते. त्यावेळी इराणमधील प्रवाशांचे विमानतळावर स्क्रिनिंगही सुरू झाले नव्हते. या प्रवाशांचा शोध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने या प्रवाशांची यादी पर्यटन मंत्रालयाला सादर केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुतेक प्रवासी पर्यटन आणि व्यवसाय व्हिसावर भारतात आले आहेत. हे प्रवासी देशाच्या कोणत्या भागात गेले हे आतापर्यंत कळू शकले नाही. चीनबाहेर कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये सर्वाधिक 92 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराण सरकारच्या अनेक नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, चीनपासून सुरु झालेल्या कोरोनामुळे जगभरामध्ये भितीचे सावट आहे. चीनमध्ये करोनामुळे 3012 जणांचा मृत्यू झाला आहे.