भारतीय संस्कृतीचे महत्त्व
पुणे, ता. 1 – “आपले धार्मिक संस्कार’ या विषयावर सुलोचना लिमये यांचे व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या, संस्काराला अत्यंत महत्त्व आहे. ज्याप्रमाणे खाणीतून निघालेल्या हिऱ्याला पैलू नसल्यामुळे किंमत नसते त्याचप्रमाणे संस्कारशून्य व्यक्ती समाजाचे ऋण फेडू शकणार नाही.
संस्काराची थट्टा होत चालली आहे ही एक शोकांतिका आहे, नवीन पिढी मागचा मौल्यवान वारसा विसरत चालली आहे. कृतघ्नता हा स्थायिभाव झाला आहे. आता पाश्चात्यांना आपल्या संस्काराबद्दल आदर वाटू लागला आहे; तेव्हा आपण त्यांचे महत्त्व पटवून घ्यायला नको का? असा सवाल लिमये यांनी केला.
प्रोफेसरांची नेमणूक करण्यासाठी सर्वत्र समान अटी
नागपूर – गव्हर्नरसाहेबांनी एक वटहुकूम काढला असून त्या अन्वये राज्यातील कोणत्याही विद्यापीठांत नेमावयाच्या प्रोफेसर, लेक्चरर व रीडर यांचेसाठी सर्वत्र समान अटी असल्या पाहिजेत, असे फर्माविले आहे.
युद्धास जॉर्डनचा नकार आणखी एक पराभव म्हणजे मक्का मदिनास धोका
बेरुत – जॉर्डनचे राजे हुसेन यांनी असे जाहीर केले आहे की, अरब राष्ट्रांनी इस्रायलविरुद्ध आणखी एक युद्ध सुरू करणे म्हणजे संकट ओढवून घेणेच होय. म्हणून जॉर्डन त्यात भाग घेणार नाही या युद्धात अरबांचा पुन्हा एकदा पराभव झाला म्हणजे सौदी अरेबियातील पवित्र इस्लामी शहरे मक्का व मदिना इस्रायलच्या हल्ल्याच्या टप्प्यात येतील.
भारतीय चित्रपट प्रदर्शन
पुणे- “भारतीय चित्रपटसृष्टीची 75 वर्षे’ हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरले आहे. जुन्या चित्रपटांतील काही प्रसंगांची छायाचित्रे, जुनी पोस्टर्स, त्याकाळच्या वृत्तपत्रातील चित्रपटांच्या जाहिराती, पुस्तके इत्यादी दुर्मिळ जिनसांचा या प्रदर्शनात समावेश आहे. नवीन निर्मितीला मार्गदर्शन होण्यासाठी जुना ठेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळातील लोकांच्या करमणुकीचे स्वरूप कसे होते याची या प्रदर्शनात कल्पना येईल.