२२३ लोकांना अटक; पुणे जिल्हा, बीड शहर येथे नवीन गुन्हे
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४१९ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटाॅक (tiktok) विडिओ शेअर प्रकरणी २० गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्या प्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे. तसेच १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.
पुणे ग्रामीण…
पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील, लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या पोलीस जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या ३३ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींनी काही राजकीय नेत्यांबद्दल पोस्ट फेसबुकवर शेअर केल्या होत्या, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात परिसरात ताण-तणाव वाढण्याची भीती होती व ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
बीड शहर….
बीड जिल्ह्यातील, बीड शहर पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या ४२ वर गेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण असून तो क्वारंटाईन न राहता सगळीकडे संचार करत आहे, अशा आशयाचा फिर्यादीची बदनामी करणारा व्हाट्सॲप मेसेज सगळीकडे पसरविण्यात आला होता .