लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत देशभरात 340 कोटी रुपये इतकी संशयास्पद रोकड जप्त करण्यात आली आहे. रोख रकमेबरोबरच मद्य, अंमलीपदार्थ आणि मौल्यवान धातू असा मिळून तब्बल 1 हजार 460 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने 10 मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतर मार्गांचा वापर होऊ नये यासाठी आयोगाने मोठ्या संख्येने निरीक्षक आणि देखरेख पथके तैनात केली. त्या पथकांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 143 कोटी रुपयांचे मद्य, 692 कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ, 255 कोटी रुपयांचे सोने आणि इतर मौल्यवान धातू तसेच 26 कोटी रुपयांच्या इतर वस्तूंचा समावेश आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक 509 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये गुजरात किनारपट्टीवर नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या 100 किलो अंमलीपदार्थांच्या साठ्याचाही समावेश आहे. त्या साठ्याचे बाजारमूल्य 500 कोटी रुपये इतके आहे. तमिळनाडूत 208 कोटी, आंध्र प्रदेशात 158 कोटी, पंजाबमध्ये 144 कोटी तर उत्तर प्रदेशात 135 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.