दहिवडी – माण व खटाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी गेली पंधरा वर्षे केलेल्या अविरत प्रयत्नांमुळे अखेर उरमोडीचे पाणी माणमध्ये आले. त्यानंतर जिहे कठापूर योजनाही पूर्ण होत आहे. या योजनेत नव्याने 32 गावांचा समावेश करण्यात आला असून यासाठी 370 कोटी रुपयांच्या कामाचे टेंडर होऊन प्रत्यक्ष कामाचा भूमिपूजन समारंभ व दहिवडी येथे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणमध्ये येत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. गोरे म्हणाले, “”गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे कठापुर) अंतिम टप्प्यात आली असून भाजपच्यावतीने मोदी सरकारने केंद्रातून या योजनेला 1331 कोटी रुपयांचा निधी 2019 मध्ये दिला. त्यामुळे या योजनेचे काम तातडीने मार्गी लागले. गेल्या वर्षी नेर तलावात पाणी आले असून आता शिरवली बोगद्याचे कामही संपत आले आहे. या योजनेचे पाणी कोणत्याही क्षणी माण तालुक्यात येऊ शकते अशी परिस्थिती आहे.
या योजनेतून आंधळी धरण भरले जाणार आहे त्यानंतर पुढे माण नदीवरील 17 बंधारे भरले जाणार आहेत. त्यामुळे आता माणच्या उत्तरेकडील धुळदेव, हिंगणी, म्हसवड, भाटकी, खडकी (लोणार), वरकुटे- म्हसवड, पळशी, रांजणी, जाशी,राणंद, सोकासन, शेवरी, वडगाव, बिदाल, बोडके, शिंदी बुद्रुक, दहिवडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द, मनकर्णवाडी, दानवलेवाडी, मार्डी, मलवडी, इंजबाव, शंभूखेड, पर्यंती, हवालदारवाडी या सर्व गावांत पाणी येणार आहे. तालुक्यातील उत्तर भागातील सिंचनाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा खर्च टाळण्यासाठी याच लाभक्षेत्राला स्वतंत्र उपसा सिंचन योजना होणार आहे.
आंधळी धरणातून 710 एचपीच्या दोन पंपांद्वारे उपसा करून बिदाल येथील वितरण कुंडात पाणी सोडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. धरणाच्या पातळीखालील गावांना थेट गुरूत्वीय पद्धतीने बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी देण्याचा समावेश प्रकल्पात केला आहे. जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेमुळे 27500 हेक्टर क्षेत्रात पाणी फिरणार असून या उपसा सिंचन योजनेत 3.17 टीएमसी पाणी माण व खटाव तालुक्यात मिळणार आहे. या योजनेत माण नदीवरील 17 बंधारे व खटाव तालुक्यातील येरळा नदीवरील 15 बंधारे भरून घेण्यात येणार आहेत व तेथून शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे.माण तालुक्यातील 15800 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. खटाव तालुक्यातील 11700 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.