मुंबई – राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह 300 आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा किंवा आश्वासन देत नाही तर ते पूर्णसुद्धा करते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. “मुंबईचा विचार नेहमी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी’ असाच केला गेला असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात संबोधताना म्हणाले, अर्थसंकल्पाचा नव्हे तर देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसं असणार आहे. जे मुंबई राहणारे कष्टकरी आहेत जे दुसऱ्याची घरं बांधतात परंतु त्यांची घरे नाही आहेत. मुंबईत अनेक जण येतात अन्न वस्त्र मिळतं. परंतु दिवसभर काम केल्यानंतर स्वतःच घरं नसते.
बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा 95मध्ये युतीचे सरकार आले होते तेव्हा झोपडपट्टीधारकांना घरं मिळाली पाहिजेत असे म्हटले होते. यानंतर अनेक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरु झाले आहेत. त्याची गती परंतु कासवाच्या गतीपेक्षा मंद राहिली आहे. आपण म्हणतो आजोबा फळांचे झाड लावतात आणि त्याची फळं नातवाला मिळतात, नातवाच्या पुढेसुद्धा दिवस जात चालले आहेत पण मलई कोण खातंय हा एक संशोधनाचा विषय आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांनाही चिमटा काढला.