नवी दिल्ली – दिल्लीमधील कथित औषध घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली सरकारने जी औषधे खरेदी केली आहे त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यामुळे दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्वी आम आदमी पक्षात असलेले आणि नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले नेते कपिल मिश्रा यांनी असा आरोप केला आहे की दिल्ली सरकारने अनावश्यक असलेल्या ओैषधांच्या खरेदीत ३०० कोटींचा गैरव्यवहार केला आहे.
त्यात माजी मंत्री सत्येंद्र मिश्रा यांचाही सहभाग असल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. वास्तविक या कथित घोटाळा प्रकरणाची चौकशी २०१७ मध्येच सुरू झाली होती. मात्र आता नव्याने हे प्रकरण तापले असून आता थेट सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. नायब राज्यपालांनी स्वत:च या प्रकरणात एका अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रूग्णालयांमधून दुय्यम दर्जाची औषधे आढळून आली आहेत. इतकेच नव्हे तर १० टक्के औषधी चाचण्यांमध्ये नापास झाली आहेत. दक्षता आयोगाकडून यासंदर्भात अहवाल आल्यावर त्याच आधारावर नायब राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या औषधांची खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आली होती व ती चाचणीत फेल ठरली आहेत.