मंचर – आंबेगाव तालुक्यात बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे 3 हजार 910 विद्यार्थी बसले आहे.मंगळवारी (दि. 18) इंग्रजी विषयाचा पेपर कॉपीमुक्त वातावरणात पार पडला. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, अशी माहिती गटशिक्षण अधिकारी पोपटराव महाजन यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात 618 विद्यार्थी, पारगांव येथील संगमेश्वर तथा बाबुराव गेनुजी ढोबळे महाविद्यालयात सुमारे 495 विद्यार्थी, शिनोली येथील भीमाशंकर विद्यामंदिर तथा टी. एस. बोऱ्हाडे महाविद्यालयात 263 विद्यार्थी, नारायणगांव येथील रा. प. सबनीस विद्यालयात सुमारे 1 हजार 195 विद्यार्थी, घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर विद्यालयात 493 विद्यार्थी आणि मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात 846 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.
मंगळवारी (दि. 18) ते बुधवार (दि.18 मार्च) पर्यंत परीक्षा चालणार आहेत. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी,यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी रामदास पालेकर यांनी दिली.