नवी दिल्ली: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथ सज्ज झाला असून यंदाचा सोहळा सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत खास असणार आहे. ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून यंदाच्या संचलनात भारतीय संस्कृतीचे भव्य दर्शन घडणार आहे. या विशेष सोहळ्यात देशभरातील विविध प्रांतांतून आलेले सुमारे २,५०० कलाकार आपली कला सादर करणार असून ‘स्वतंत्रतेचा मंत्र – वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र – विकसित भारत’ ही यंदाच्या परेडची मुख्य संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या सोहळ्याचे सांगीतिक सारथ्य ‘आरआरआर’ फेम ऑस्कर विजेते संगीतकार एम. एम. कीरावनी करत असून त्यांनी वंदे मातरमच्या सुवर्णमयी इतिहासाला उजाळा देणारे विशेष संगीत तयार केले आहे. या संपूर्ण सादरीकरणाचे प्रकटीकरण ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या आवाजात होणार असून संतोष नायर यांनी नृत्य दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम साकारला जात असून संध्या रमण यांनी कलाकारांच्या वेशभूषेची जबाबदारी स्वीकारली आहे. या प्रदर्शनात भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुड़ी आणि मणिपुरी यांसारख्या विविध भारतीय नृत्यप्रकारांचे दर्शन संपूर्ण जगाला घडणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात केंद्र सरकारने ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीला फाटा देत एक नवीन पायंडा पाडला आहे. परेड पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या बैठक व्यवस्थेला आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या विशिष्ट नावाऐवजी भारतीय नद्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, कावेरी आणि नर्मदा यांसारख्या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. तसेच २९ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘बीटिंग रिट्रीट’ सोहळ्याच्या बैठक व्यवस्थेला बासरी, डमरू, सतार, वीणा आणि तबला यांसारख्या भारतीय वाद्यांची नावे देऊन भारतीय वारशाचा सन्मान करण्यात आला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे यंदाच्या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या निमंत्रण पत्रिकेवर वंदे मातरमच्या १५० व्या वर्षाचा विशेष ‘लोगो’ छापण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आकाशात ‘वंदे मातरम’चा संदेश देणारे बॅनर्स आणि रंगीबेरंगी फुगे सोडून राष्ट्रवादाचा जयघोष केला जाईल. तसेच राष्ट्रगीताचे रचयिता बंकिमचंद्र चॅटर्जी यांना मानवंदना देण्यासाठी मुख्य मंचावर विशेष पुष्प कलाकृती साकारल्या जाणार आहेत.