सातारा – जिल्ह्यात शुक्रवारी आणखी 20 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रोनाग्रस्त रुग्णांची संख्या 599 झाली आहे. ही संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर पोहचल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. शक्रवारी सहा जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील 241 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर करोनामुळे 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध केद्रांतून 215 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तापसणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष असे दोन जणांचा रिपोर्ट करोनाबाधित आले आहेत. तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली.
त्यापूर्वी शुक्रवारी सकाळी जिल्हयातील 18 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल. त्यामुळे दिवसभरात नवे 20 रुग्ण निष्पन्न झाले. मुंबईतून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण (ता. खटाव) येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यू झाला होता. या पुरुषाचा मृत्यूपश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. या 18 बाधित रुग्णांमध्ये खटाव तालुक्यातील सातेवाडी (वडूज) येथील 76 वर्षीय महिला व गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष (मृत), खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी येथील 50 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील समर्थनगर कोडोली येथील 19 वर्षीय युवक व करंडी येथील 25 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती, जावळी तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, माण तालुक्यातील वडजल येथील 55 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील 25 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे.
खावली करोना केअर केंद्रातील 2 व रायगावच्या करोना केअर केंद्रातील 4 अशा एकूण 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील एन. सी. सी. एस. यांनी 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 68, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 15, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 6, खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयातील 93, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 33 अशा एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यातील एन. सी. सी. एस. यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.