2 Governor Resigns: एकाच दिवशी दोन राज्यपालांचे राजीनामे; पश्चिम बंगालचे सीव्ही आनंद बोस आणि लडाखचे कविंदर गुप्ता पदमुक्त
2 Governor Resigns: गुरुवारी एकाच दिवशी दोन राज्यपालांनी राजीनामा दिल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

2 Governor Resigns: गुरुवारी एकाच दिवशी दोन राज्यपालांनी राजीनामा दिल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी साडेतीन वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिला, तर लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी अवघ्या नऊ महिन्यांत पद सोडले.
सीव्ही आनंद बोस यांचा राजीनामा –
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी गुरुवारी राजभवनातून राजीनामा दिला. “राज्यपाल कार्यालयात पुरेसा वेळ घालवला,” असे ते पीटीआयशी बोलताना म्हणाले. बोस यांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी नियुक्ती झाली होती आणि त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारला होता. यापूर्वी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी राज्यपालपद सोडल्यानंतर बोस यांची नियुक्ती झाली होती. तोपर्यंत मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार होता.
West Bengal governor CV Ananda Bose resigns in Delhi: Lok Bhavan official
— Press Trust of India (@PTI_News) March 5, 2026
वादग्रस्त कार्यकाळ –
बोस यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारशी सातत्याने संघर्षाचा राहिला. राजभवन आणि तृणमूल काँग्रेस सरकार यांच्यात प्रशासकीय मुद्दे, कायदा-सुव्यवस्था आणि राज्यपालांच्या टीकेवरून वारंवार वाद झाले. २०२४ मध्ये राजभवनातील एका महिला कर्मचाऱ्याने बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. बोस यांनी हे आरोप फेटाळले आणि चौकशीची मागणी केली, परंतु या प्रकरणाने राजभवन आणि ममता सरकार यांच्यातील वाद आणखी चिघळला.
I am shocked and deeply concerned by the sudden news of the resignation of Shri C. V. Ananda Bose, the Governor of West Bengal.
The reasons behind his resignation are not known to me at this moment. However, given the prevailing circumstances, I would not be surprised if the…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) March 5, 2026
ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया –
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या अचानक राजीनाम्याने त्यांना धक्का बसला आणि त्या खूप चिंतित झाल्या असून राजीनाम्यामागील कारणे त्यांना माहीत नाहीत. त्यांनी आरोप केला की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यपालांवर दबाव आणला असावा. तसेच आपल्याशी सल्लामसलत न करता आर. एन. रवी यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. हा घटनात्मक संकेतांचा आणि सहकारी संघराज्य व्यवस्थेचा भंग असल्याचेही त्या म्हणाल्या.
लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांचाही राजीनामा –
लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी अवघ्या नऊ महिन्यांत गुरुवारी पद सोडले. त्यांनी १८ जुलै २०२५ रोजी पदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात लडाखमध्ये मोठी अस्वस्थता होती. लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स या संघटनांनी राज्याचा दर्जा, सहावी अनुसूची संरक्षण आणि स्थानिकांसाठी नोकरी आरक्षण या मागण्यांसाठी आंदोलने केली होती.
कविंदर गुप्ता कोण आहेत?
कविंदर गुप्ता हे लडाखचे तिसरे उपराज्यपाल होते. यापूर्वी ते अविभक्त जम्मू-काश्मीर राज्याचे अंतिम उपमुख्यमंत्री होते. तसेच जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.





