Sunetra Pawar : केळी पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा; सुनेत्रा पवारांचे जिल्हा प्रशासनाला कडक आदेश
Sunetra Pawar : शुक्रवारच्या (५ जून) वादळी पावसामुळे काऱ्हाटी, गुणवडी, मोडवे आणि माळवाडी परिसरात केळीच्या बागा आणि घरांचे अतोनात नुकसान.

Sunetra Pawar – तालुक्यात शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरात केळी पिकाचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रत्यक्ष केळी पीक क्षेत्रावर जावून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली. केळी पिकाचे आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा, असे आदेशही सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आतापर्यंत झालेल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार स्वप्नील रावडे, तालुका कृषी अधिकारी सचिन हाके परिसरातील शेतकरी,
लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, बधितांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळण्याच्यादृष्टीने बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम केले जात आहे. राज्य शासन संकटाच्या काळात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते. त्यामुळे धीर धरा, खचून जावू नका, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

काऱ्हाटी परिसरात शुक्रवारी, दि. ५ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सुनेत्रा पवार यांनी मौजे माळवाडी (लोणी) येथे २ जून रोजी झालेल्या वादळात पत्र्याच्या शेड पडून मयत झालेल्या नंदाबाई जनार्धन लडकत यांच्या कुटुंबीयांचे भेटून सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंबीयांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून ४ लाख रुपये व २ शेळ्यांना ८ हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी प्रल्हाद पांडुरंग लडकत यांना १६ हजार रुपये, बाळासाहेब अमृता लडकत यांना ८ हजार रुपये आणि नंदा प्रताप फरांदे यांना १२ हजार रुपयांचा नुकसान भरपाईबाबतचा धनादेश सुपूर्द करण्यात आले.
१६९ शेतकऱ्यांचे नुकसान
मौजे गुणवडी येथील राधा रवीन आगवणे यांचे घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले आहेत. मौजे काऱ्हाटी येथे नारायण लोणकर यांच्या शेतात सुमारे संख्या २५० ते ३०० केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मौजे मोडवे येथील गुलाब मोटे यांच्या १० शेळ्या, तिन मेंढ्या व १ कुत्रा वीज पडून मयत झालेले आहेत. तालुक्यातील ४ गावात १६९ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.





