Balochistan – बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीमध्ये १३ दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी बंदी घातलेल्या वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित होते. गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी ही कारवाई केली होती, असे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने म्हटले आहे. हे सर्व दहशतवादी दिनांक २४ आणि २५ डिसेंबर रोजी झालेल्या तीन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मारले गेले. पंचगुर, कोहलू आणि कलाट येथे या दोन कारवाई झाल्या होत्या. तिन्ही ठिकाणी दहशतवादी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर तातडीने या मोहिमा राबवण्यात आल्या, असे आयएसपीआरने म्हटले आहे. पंचगुर जिल्ह्यात झालेल्या कारवाईच्यावेळी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला सुरक्षा दलांनी वेढा घालून कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली आणि ४ दहशतवादी मारले गेले. कोहलू भागात गुरुवारी झालेल्या कारवाईच्यावेळी दोन्ही बाजूंनी मोठा गोळीबार झाला आणि ५ दहशतवादी मारले गेले. तर बुधवारी कताट भागात सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये ८ दहशतवादी मारले गेले. शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आला. हे दहशतवादी अनेक घातपाती कारवायांमध्ये गुंतलेले होते, असेही निवेदनात म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला देखील कलाट भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये १२ दहशतवादी ठार झाले होते. बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतादी कारवायांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी अझ्म-ए-इस्तेहकाम ही मोहिम सुरू केली आहे.