वर्षभरात 150 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली – यावर्षी भारतीय लष्कराच्या दहशतवाद विरोधी कारवायांस मोठ्या प्रमाणात यश आले आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत दिडशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तसेच मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लष्कराकडून सीमेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावले आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे. पाक लष्कराने यावर्षात आत्तापर्यंत तब्बल तीन हजार 800 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून काश्मीरात दहशतवाद पसरविण्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तान मदत करत असल्याचे भारताकडे अनेक पुरावे असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून काश्मीरात सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना काश्मीरात घुसण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मदत करण्यात येत आहे. त्यामुळे पाककडून अनेकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने सुमारे चार हजार वेळा गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, अनेक वेळा दहशतवाद्यांनी सीमेवर शस्त्रात्रे ठेवली. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यास पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असून सीमेवर सगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या कारवाया सुरू असल्याने तेथील नाकाबंदी भारताकडून अधिक कडक करण्यात येत आहे.





