मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदानाचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध 12 मान्यवरांची “सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. समाज माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.