पुणे – महापालिकेकडून नदीकाठ विकसन प्रकल्प राबविताना आधी महापालिकेने शहरातील सांडपाणी शुद्ध करून नदीत सोडावे नंतर काठाचा विकास करावा अशी मागणी केली जात आहे. मात्र, महापालिकेकडून नदीकाठ विकसन प्रकल्पासोबतच शहरात नवीन 11 सांडपाणी शुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार असून, त्यातील आठ केंद्रांचे काम प्रत्यक्षात सुरू आहे. तर 11 केंद्र पूर्ण झाल्यानंतर शहरात तयार होणारे 100 टक्के सांडपाणी संकलन करून नंतरच ते नदीत सोडण्यात येणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यासाठी तब्बल 1275 कोटींच्या खर्चाची जायका योजनाही प्रशासनाकडून राबविण्यात येत असल्याचा खुलासा शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केला आहे.
महापालिकेकडून तब्बल 44 किलोमीटरचा नदीकाठ विकसन करणारा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात सुमारे साडेचार हजार झाडे काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवला आहे. या प्रस्तावास पर्यावरण अभ्यासक, शहरातील पर्यावरण प्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला असून, आधी महापालिकेने नदीत येणारे सांडपाणी थांबवावे नंतर झाडे काठ विकसनावर यावे अशी मागणी केली जात आहे.
याबाबत बोलताना वाघमारे म्हणाले की, शहरात गोळा होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यासाठी नव्याने 11 एसटीपी प्लांट्स उभारण्यात येत आहेत. या प्लांट्सची उभारणी झाल्यानंतर नदीतील पाण्याची गुणवत्ता निश्चितच सुधारण्यास मदत होणार आहे. हे प्लांट्स उभारल्यानंतरही आजही नदीला मिळणाऱ्या कोथरूड, आंबीलओढा, नागझरी नाला आणि भैरोबा नाल्यातून मैलापाणी थेट नदीपात्रात येते. प्रामुख्याने या नाल्यांच्या कडेला काही ठिकाणी असलेल्या झोपडपट्टयांमधील मैलापाणी नाले, ओढ्यांमध्ये येते. या नाले, ओढ्यांच्या कडेने ड्रेनेज लाइन विकसित केल्या आहेत. परंतू अनेक ठिकाणी काही समाजकंटकडून ड्रेनेज व पाईपलाईन फोडण्यात येत असल्यानेही मैलापाणी नाले, ओढ्यातून वाहत असल्याचे पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर नदी सुधार योजनेमध्ये या नाले, ओढ्यांतून येणारे मैलापाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या दोन्ही तिरांवरून मुंढव्यापर्यंत 1600 मि.मि. व्यासाच्या पाईपलाईन टाकण्याचे प्रयोजन नदी काठ सुधार योजनेमध्ये करण्यात आले आहे. नाले व ओढे ज्याठिकाणी नदीला मिळतात तेथे टॅपिंग करून या पाईपलाईन जोडण्यात येतील. त्यामुळे सांडपाणी नदीत येणार नाही तसेच पावसाळयात नाले तसेच ओढ्यांमध्येही स्वच्छ पाणीच नदीत येईल असा दावाही वाघमारे यांनी केला आहे.