“एनएचएआय’चे काम असताना महापालिकेच्या खिशातून विनाकारण खर्च
जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या स्थलांतराचे काम
पुणे – ‘नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया’चे (एनएचएआय) काम आणि भुर्दंड मात्र महापालिकेला…, तोही थोडा थोडका नव्हे तर सुमारे सव्वादहा कोटी रुपये आहे, असे असताना एक-एक पैसा गोळा करण्याच्या बाता करणाऱ्या स्थायी समितीने मात्र या कामाचे सव्वादहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाचे वडगाव ते कात्रज चौक या नवले पुलादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यात अडथळा ठरणाऱ्या जलवाहिन्या आणि मलनि:सारण वाहिन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. या स्थलांतरणासाठी 10 कोटी 23 लाख 99 हजार 489 रुपये आवश्यक आहेत. यासाठी जायका प्रकल्पातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पातील योजनेच्या 85 कोटी रुपयांच्या तरतुदीतून वर्गीकरण करून वरील रक्कम देण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
रस्ता रुंदीकरणाचे हे काम “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’चे आहे, असे असताना त्यांनी हे काम करून देणे किंवा हे काम महापालिकेने करायचे असेल तर याचा खर्च पालिकेला देणे आवश्यक आहे, असे असताना प्राधिकरणाने हा खर्च महापालिका प्रशासनाच्या माथी मारला आहे.
केंद्रात भाजपची सत्ता असताना…
महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना एक-एक पैसा गोळा करताना पालिका प्रशासनाचा घाम निघतो आहे, असे असताना हा वाढीव खर्च पालिकेने गळ्यात घेतला आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत प्राधिकरणाशी वेळोवेळी बोलणेही केले होते. मात्र त्यांनी याचा खर्च देण्याला किंवा स्वत: हे काम करण्याला पूर्णपणे नकार दिला आहे. केंद्रात भाजपची सत्ता असतानाही महापालिकेतील सत्ताधारी हा खर्चाचा बोजा कमी करू शकले नाहीत. यातून खर्चाचा हा बोजा पालिकेच्याच तिजोरीवर पडला आहे.