पुणे -पुरंदर येथील नियोजित विमानतळाची उभारणी करताना भविष्यातील चाळीस ते पन्नास वर्षांची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांची वाढती संख्या आणि मालवाहतूक करणे अधिक सोयीचे होणार आहे. पुरंदर विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास वर्षभरात सुमारे 1 कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकणार आहे, अशी बाब डार्स कंपनीने केलेल्या प्रकल्प अहवालात नमूद केली आहे.
पुरंदर येथे 2,400 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यास केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराची गरज लक्षात घेऊन मोठ्या व लांबपल्ल्याच्या विमान उतरणे शक्य व्हावे, यासाठी या विमानतळावर किमान 4 हजार मीटरच्या दोन धावपट्ट्या उभारण्याचे नियोजन केले आहे. दोन धावपट्ट्यांमुळे विमानांचे टेकऑफ आणि लॅडींग यांच्या वेळेत मोठी बचत होण्यास मदत होणार आहे.
तसेच, विमानांची संख्या वाढविणे हे देखील त्यामुळे शक्य होणार आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातून परराज्य व परदेशात होणारी माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. वेगाने या क्षेत्राचा विकास होत आहे. त्याचा विचार करून दोन धावपट्ट्यांबरोबर पर्यायी व्यवस्था असावी म्हणून चार धावपट्ट्या असाव्यात, अशी मागणी होत आहे.
यापूर्वी देशात जी विमानतळे उभारण्यात आली. त्यामध्ये बहुतांश ठिकाणी एकच धावपट्टी आहे. त्यामध्ये लोहगाव विमानतळाचा समावेश आहे. पूर्वी विमानांचा आकार मर्यादित होता.
त्यामुळे त्या पद्धतीने धावपट्टी उभारण्यात आली होती. मात्र, एका धावपट्टीमुळे अनेक गोष्टींवर मर्यादा येतात. गेल्या काही वर्षांत जागेच्या वाढलेल्या किंमती आणि त्यामुळे भूसंपादनात येणारे अडथळे यामुळे भविष्यात विमानतळावरील धावपट्ट्यांची संख्या वाढविणे, त्यांच्या लांबीत वाढ करणे अशा अनेक अडचणी येतात. यासर्व गोष्टींचा विचार करून विकसित करणाऱ्या विमानतळांमध्ये कमीत कमी दोन व त्यापेक्षा अधिक धावपट्ट्या असाव्यात, असा विचार पुढे येत आहे.
पुरंदर येथील विमानतळाचे “डीपीआर’ (सर्वंकष प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम जर्मन येथील डार्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.