शिरूर -पुणे रस्त्याचे चौपदरीकरण झाले, त्यावेळी शिरूर-पुणे रस्ता आता 45 मिनिटांत पार करता येणार, असे सांगितले; परंतु या रस्त्यावर वाघोली, फुलगाव फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी, एल ऍण्ड टी फाटा, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव भागात वेगवेगळे फाटे, आठवडे बाजारामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. ही कोंडी आता नागरिक, वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. तीनही गावांत वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी दोन ते तीन तास होत असते.
पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा त्रास होत असताना बांधकाम खाते, पोलीस खाते, तीनही गावांच्या ग्रामपंचायत ठोस भूमिका घेण्यास तयार नाहीत. बांधकाम खाते म्हणते उड्डाण पुल बांधायचा, पोलीस खाते सांगते ट्रॅफिक पोलीस संख्या वाढवू, ग्रामपंचायत हातावर हात ठेवून गप्प आहे. हा सर्व आश्वासनाचा बाजार, कोणी याबाबत ठोस कार्यवाही करण्यास तयार नाहीत. याबाबत शासन, प्रशासनदेखील गप्प आहेत. त्यामुळे आता या रस्त्यांची वाहतूक कोंडी रामभरोसे झाली आहे. हायब्रिड ऍमिनिटिमधून रस्त्याच्या रुंदीकारणाचे काम सुरू होणार आहे, हे काम दोनशे कोटींच्या वर आहे. हे काम करताना शासनाने प्रमुख गावांमधून उड्डाणपूल बांधले तरी वाहतूक कोंडी होणार नाही; परंतु या कामातून सर्वांचीच मर्जी आणि अर्थकारण होणार आहे. त्यांना जनतेची नेमकी अडचण काय हे माहिती असूनही हा घाट घातला आहे. दुसरीकडे आठपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार आहे, असे बोलले जाते. हा शासनाचा डबल ढोलकी कार्यक्रम सुरू आहे; परंतु वाहतूक कोंडीतून जनतेला सोडवा हीच माफक अपेक्षा आहे.