मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीत 18 खासदार निवडूण आल्यानंतरही केंद्रिय मंत्रिमंडळात केवळ एकच मंत्रिपद मिळालेल्या शिवसेनेने आता लोकसभेतील उपसभापतीपदावर दावा ठोकला आहे. उपसभापतीपद हे शिवसेनेलाच मिळायला पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
लोकसभा सभापतीपदाची निवडणूक 19 जून रोजी होती. निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबत मनेका गांधींसह भाजपच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेचे उपसभापतीपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. मात्र, भाजप हे पद शिवसेनेला देईल का याबाबत शंका आहे. कारण एनडीएत नसलेल्या बीजेडी व वायएसआर आदी पक्षांना लोकसभेतील उपसभापतीपद देऊन राज्यसभेतील बहुमताची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याची कुणकुण लागताच लोकसभेच्या उपसभापतीपदावर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक 18 खासदार निवडून आले आहेत. नितीशकुमार यांच्या जेडीयूचे 16 खासदार निवडून आले आहेत. प्रादेशिक पक्ष बीजेडीचे 13, तर जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचे 22 खासदार निवडून आले आहेत. या दोन पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना लोकसभेचे सभापतीपद शिवसेनेला देण्यात आले होते. शिवसेनेने या पदावर ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नियुक्ती केली होती. आज मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वामध्ये शिवसेनेने उपसभापतीपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोणता निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.