मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला अवघ्या 9 जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी केला आहे. भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.
सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरील आपला दावा सोडला असून, या ठिकाणी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तिकीट दिले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी भाजपवर शिंदे व अजित पवारांच्या पक्षांना संपवण्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात केवळ 9 जागा मिळतील असा दावा केला आहे.
देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मूळ पक्ष म्हणून ज्या पक्षांना मान्यता दिली ते पक्ष कमी जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर ज्या पक्षांना खोटे ठरवण्यात आले ते त्यांच्यापेक्षा जास्त जागा लढवत आहेत. आमच्या हाती एक सर्व्हे आला आहे. त्यानुसार, राज्यात विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला सर्वाधिक 39 जागा मिळणार असून, सत्ताधारी महायुतीलाी अवघ्या 9 जागा मिळणार आहेत, असे अमित देशमुख म्हणाले.
महाराष्ट्रातील परिस्थितीत फारच दयनीय
महाराष्ट्रात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे, कोण कुणाच्या तिकिटावर उभा राहणार आहे, हे काहीच कळण्यास मार्ग नाही. भाजपने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फोडाफोडी केली असून, यामुळे राज्यातील आजची राजकीय परिस्थितीत फारच दयनीय झाली आहे, असेही अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.