मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, नागापूर, वळती, रांजणी परिसरात शनिवारी (दि. 13) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आरण लावून शेतामध्ये ठेवलेला कांदा आणि गुरांचा सुका चारा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
शेतातील पिके आणि गुरांच्या चाऱ्याचे पावसापासून रक्षण करण्यासाठी त्यांना वादळी वाऱ्यात कसरत करावी लागली. अनेक गावांमध्ये सध्या कांदा काढणी उरकत आली आहे.शेतकऱ्यांचे कांदे शेतातच काढून पडले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याची आरन लावली आहे. त्याचप्रमाणे गुरांचा सुका चाराही साठवण्याचे काम सुरु आहे. ही सर्व कामे सुरु असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकरी वर्गाची तारांबळ उडवली.जनावरांचा चारा तसेच काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांनी ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद याचा वापर करून पावसापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला.
जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे कांदा झाकताना अडचण येत होती. अशातच विजेचा कडकडाट सुरु असल्याने जीवितास धोका असतानाही शेतकरीवर्ग कांदे झाकण्याचे काम करीत होता. यावर्षी उन्हाळा कडक असल्यामुळे अवेळी आलेल्या पावसामुळे हवेत निर्माण झाल्याने लोकांमध्ये समाधानाची भावना आहे.