पुणे : निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होतात. खरी सेवा ही आपुलकीच्या भावनेतूनच निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात आजही चांगुलपणा टिकून आहे. समाजानेही अशा सेवाकार्यात यथाशक्ती सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. निस्वार्थ बुद्धीने आपलेपणाने केलेली सेवा म्हणजे धर्म होय, असेही सरसंघचालक म्हणाले. नांदोशी (पुणे) येथे ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या कोनशिला समारंभात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले आणि संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लतादीदी आणि आशाताई यांच्या संवेदनेतून उमटलेल्या स्वरांचे सामर्थ्य अलौकिक असून, त्यांचे संगीत कधीही खंडित होणार नाही, अशी भावना डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, “शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींचाही जीवनावश्यक गरजांच्या यादीत समावेश करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला सुलभ व परवडणारे शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळायला हवी. शासन व प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेच; परंतु ‘हा देश माझा आहे’ या भावनेने आपणही अशा कार्यात खारीचा वाटा उचलला पाहिजे. सेवा भावातील आपलेपणा आणि चांगुलपणा म्हणजेच खरा धर्म आहे.” – व्यावसायिकीकरणाच्या युगातही मंगेशकर कुटुंबीयांचा सेवाभाव : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबाच्या देशभक्तीचा गौरव केला. ते म्हणाले, “मंगेशकर कुटुंबीय केवळ संगीतासाठीच नव्हे, तर प्रखर देशभक्तीसाठीही ओळखले जाते. विशेषतः स्वातंत्र्यवीर सावरकरांशी या कुटुंबाचे घनिष्ठ नाते राहिले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कधीही सेवेचा सौदा केला नाही, तर सेवाभाव जपून हजारो रुग्णांना उपचार दिले. आजच्या काळात ‘अफोर्डेबल केअर’ची मोठी गरज आहे. अनेकदा धर्मादाय संस्था आर्थिक संकटामुळे व्यावसायिकीकरणाकडे वळतात; मात्र पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केवळ सेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे. हाच वारसा आता ‘लता-आशा’ रुग्णालयाच्या रूपाने विस्तारणार आहे. या परिसराकडे येणारा रस्ता प्रशस्त करणे आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, तसेच धर्मादाय संस्थांना सवलती देण्याचाही प्रयत्न राहील. असेही ते म्हणाले. – गाण्यापलीकडची राष्ट्रभक्ती : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या संघर्षाचे कौतुक करताना सांगितले की, “आशाताईंनी मोठा संघर्ष करून जीवनाचे ‘आनंदगाणे’ गायले. संगीतविश्व लतादीदी आणि आशाताईंच्या सुरांशिवाय अपूर्ण आहे. या नवीन रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आरोग्यसेवा मिळेल. मंगेशकर कुटुंबीयांनी गाण्यापलीकडे जाऊन आपली राष्ट्रभक्ती जपली आहे.” – रुग्णालयाचा विस्तार आणि शैक्षणिक प्रकल्प कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी केले. ते म्हणाले, “लतादीदी आणि आशाताई या संगीताच्या आकाशगंगेतील दोन अढळ तारे आहेत. जोपर्यंत संगीत आहे, तोपर्यंत त्यांची स्मृती चिरंतन राहील. या प्रस्तावित रुग्णालयात आठ मुख्य संस्था असतील. पहिल्या टप्प्यात सर्जिकल आणि मेडिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल. तसेच, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सहकार्याने मेडिकल कॉलेजचीही निर्मिती करत आहोत.” सूत्रसंचालन अनिरुद्ध देडके यांनी केले.