पावसाळ्याच्या तोंडावर संरक्षणात्मक उपाययोजना सुरू
पुणे – जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील 23 गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांमध्ये संरक्षक उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार या गावांमध्ये संरक्षण भिंत, वृक्षारोपण, पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करणे आदी कामे सुरू आहेत.
माळीण येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील डोंगर उतारावर वसलेली घरे, वाड्या, गावांच्या प्राथमिक पाहणीत अशी 95 ठिकाणे धोकायदायक असल्याचे समोर आले होते. या ठिकाणांची भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मार्फत पाहणी करण्यात आली. त्यात 23 गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला होता.
या गावांमध्ये सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यांनी सुचविलेल्या शिफारसीनुसार या गावांतील कामांसाठी 3 कोटी 65 लाख 23 हजार रुपयांचा निधी मार्च 2018 रोजी मंजूर करण्यात आला. “सीओईपी’ने दिलेल्या या अहवालात या गावांमध्ये तातडीने वृक्षारोपण, ड्रेनेज सिस्टीमसह पाणीवहन यासारख्या उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली होती. यातील 16 गावांमधे कामास सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर, भोर तालुक्यातील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशी तालुक्यातील घुटके आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे ही गावे वन क्षेत्रात असल्याने येथील कामे वन विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहे. यातील सुमारे 16 गावांमधील कामे लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.