Ujani Dam Bridge – राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर आणि करमाळा तालुक्यांच्या विकासाला ऐतिहासिक चालना देणारा निर्णय जाहीर झाला असून उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयावर ८५० मीटर लांबीचा भव्य पूल उभारण्यासाठी तब्बल ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील दळणवळणाला नवे आयाम मिळणार असून सुमारे ४० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार असल्याने हा प्रकल्प ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या ऐतिहासिक मंजुरीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. उजनी जलाशय परिसरातील नागरिकांसाठी दळणवळणाचा कायमचा प्रश्न सोडविणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. इतिहासात नोंद होईल, असे हे पाऊल ठरले असून उजनी जलाशयावर दोन पुलांची व्यवस्था करण्यामध्ये यशस्वी ठरणारे ते इंदापूर तालुक्याचे पहिले लोकप्रतिनिधी ठरले आहेत. या पुलामुळे बारामती–लाकडी कळस–लोणी देवकर–चांडगाव मार्ग (प्रजिमा-६५) आणि कोर्टी–दिवेगव्हाण–पारेवाडी रेल्वे स्टेशन–केतूर नं.२–पोमलवाडी मार्ग (प्रजिमा-१२४) हे दोन महत्त्वाचे मार्ग थेट जोडले जाणार आहेत. चांडगाव (ता. इंदापूर) येथून उजनी जलाशय ओलांडत पोमलवाडी (ता. करमाळा) येथे उभारण्यात येणाऱ्या या पुलाची लांबी सुमारे ८५० मीटर असेल. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ या प्रकल्पासाठी अंदाजे ३४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यांमधील संपर्कासाठी नागरिकांना उजनी धरणाला मोठा वळसा घालत भिगवण किंवा टेंभुर्णी मार्गे प्रवास करावा लागतो. त्यामुळे सुमारे ७० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. मात्र, नवीन पुलामुळे हे अंतर थेट ४० किलोमीटरने कमी होणार असून दोन्ही तालुक्यांतील नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. या पुलामुळे पोमलवाडी, चांडगाव तसेच उजनी धरणकाठच्या अनेक गावांतील नागरिकांना व्यापार, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी इंदापूर, बारामती तसेच पुणे येथे ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच इंदापूर, बारामती, दौंड आणि कर्जत परिसरातील साखर कारखान्यांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पर्यटनाला वाव मिळणार पर्यटनाच्या दृष्टीनेही हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.उजनी धरण परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने येणारे फ्लेमिंगो तसेच इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या या पुलामुळे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन, लघुउद्योग आणि व्यवसायालाही मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पासंदर्भात बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे.या प्रकल्पासाठी भक्कम निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी विशेष आभार मानले. उजनी जलाशयावर उभारला जाणारा हा पूल केवळ दळणवळणाचा मार्ग नसून ग्रामीण विकास, पर्यटन, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रगतीला चालना देणारा विकासाचा सेतू ठरणार असल्याची भावना इंदापूर आणि करमाळा परिसरात व्यक्त होत आहे.