– अरुण गोखले
एकदा तुमच्या माझ्या सारखीच एक संसार प्रपंच करणारी एक व्यक्ती पू. गोंदवलेकर महाराजांकडे आली. त्यांना नमस्कार करून तिथेच बसली. त्या व्यक्तीकडे एकदा निरखून पाहात महाराजांनी त्यांना विचारले ‘‘काही विचारायचे आहे का?’’ त्या व्यक्तीने मान डोलावली. त्यावर महाराज म्हणाले, ‘‘मग विचाराना काय विचारायचे ते. उगाच संकोच कशाला?’’ त्यावर थोडे पुढेे सरकत ती व्यक्ती म्हणाली, ‘‘महाराज! हा संसार प्रपंच तर दु:खाचा आहे. त्याची तोंडमिळवणी करताना अगदी नाकी नऊ येतात. असं असताना तुम्ही पण हा संसार प्रपंच करत आहात; पण तसे असले तरी तुम्ही मात्र असे शांत आणि सुखी समाधानी कसे?’’
त्यावर हसत महाराज त्यांना म्हणाले, ‘‘बाबारे! काय सांगू, ही सारी माझ्या आईची कृपा आहे. खरं तर मी सुद्धा या संसार प्रपंच्याच्या गुंत्यात पडणार नव्हतो. तशी माझी इच्छाही नव्हती. मला तर खरं म्हणजे माझ्या सद्गुरूंनी दिलेले रामभक्ती, प्रचार आणि प्रसाराचेे जीवितकार्य करायचे होते. पण जेव्हा मला हे कार्य करायचे आहे, संसार प्रपंच करायचा नाही तर त्यात अडकणार्या जीवांना सोडवायचे आहे, हे आईस सांगितले तेव्हा आई मला काय म्हणाली माहीत आहे, ‘‘गणू बाळा, काठावर उभे राहून पाण्यात बुडणार्याला बोध करणे सोपे असते.
पण पाण्यात बुडणारा जीव हा नेमका कोणत्या भोवर्यात अडकतो आहे, त्याला कोणत्या खोलीची कल्पना येत नाही. तो कोणत्या धारेला लागतोय. कशाने गटांगळ्या खातो हे ज्याने प्रत्यक्ष अनुभवून पाहिले आहे ना त्याच्याच बोधास लोक मान देतात. तुला लोकांना शिकवायचे आहे ना त्या आधी तू त्यात पड. त्यातले धोके ओळख, गुंता लक्षात घे. दु:खाचे मूळ शोध आणि मग इतरांना बोध कर.
हे बघ. या सर्व संसार प्रपंच्याचं मूळ आहे ते दु:ख आणि ते दु:ख माणसाला होते ते त्याच्या मी, माझी, माझे म्हणण्याने. संसार माझा म्हणून न करता तो ईश्वराचा, रामाचा म्हणून केला ना की त्याचे दु:ख होत नाही. माझं म्हणणे हा स्वार्थ आणि त्याचा मानून तो करणं हा परमार्थ.’’
खरं सांगतो मी त्या माझ्या आईच्या बोधाप्रमाणेच माझा संसार हा माझा न मानता त्याचा मानतो, हेच माझ्या सुखी समाधानी असल्याचे गमक आहे.’’ हे ऐकून ती व्यक्ती धन्य झाली.