करोनाचे संकट नैसर्गिक आहे, की मानवनिर्मित. हे यथावकाश स्पष्ट होईल. प्राथमिकता आहे या संकटाला तोंड कसे द्यायचे. करोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय, पोलीस व जिल्हा प्रशासन व्यवस्थेतील सर्वांवर आपल्या वागण्याचा ताण वाढणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. करोनामुळे माणूस अंतर्मुख झाला, हे चांगले झाले. जीवनाच्या गरजा स्पष्ट झाल्या. जीवघेणी स्पर्धा माणसाला जगूच देत नाही, हे देखील समजले. कुठेतरी जीवनयात्रेचा शेवट ठरलेला आहेच. त्यामुळे आपण एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागावे. आहे त्या परिस्थितीत आनंद घ्यायला शिकले पाहिजे.
या संकटात सर्वात जास्त हाल झाले ते असंघटीत कामगारांचे. मुंबई-पुण्यातून ते अक्षरश: चालत गावाकडे निघाले आहेत. त्यांच्या वाट्याला येणारे दु:ख पाहिले, की मन हेलावून जाते. याही स्थितीत काही सेवाभावी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या, ही तेवढीच समाधान देणारी बाब. या संकटकाळात आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. गेलेले कामगार जर पुन्हा आलेच नाहीत तर…! औद्योगिक क्षेत्राचे चाक फिरेल का? हॉटेल्ससह इतरही अनेक क्षेत्रात तेच काम करत आहेत.
भविष्यात ही सेवा कशी असेल? याचीही चिंता आहे. उद्योजकांसह सर्वांनीच अर्थव्यवस्थेचा कणा असलेले हे कामगार सन्मानाने सांभाळायला हवेत. त्यांना दिले जाणारे वेतन समाधानकारक असायला हवे. त्यांच्याही श्रमाला प्रतिष्ठा असायला हवी. त्यासोबत याही स्थितीत ज्या बळीराजाने स्वत:चा जीव धोक्यात घालून तुमच्यापर्यंत शेतमाल पोचविला. त्याच्या शेतमालास सर्वांनीच योग्य भाव द्यावा. तरच त्याचेही अर्थचक्र सुरळीत चालू शकेल. करोनाला हरविण्यासाठी सर्वांनीच घरात राहण्याची गरज आहे.
ऍड. युवराज पाटील , संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर.
संपर्क : 9860566421
संपूर्ण देशात सध्या कोविड-19 या महामारीने थैमान घातले आहे. या आजारावर अद्यापपर्यत लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सध्यातरी या आजारापासून बचाव करण्यासाठी “घरातच राहणे’ हाच एकमेव उपाय आहे. अत्यंत आवश्यक काम नसल्यास घराबाहेर न निघण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर घराबाहेर निघताना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मास्कची आरोग्य विभागास तव्दतच करोनायोध्दा म्हणून कार्य करणाऱ्यांना अत्यंत निकड आहे.
या मास्कचा तुटवडा निर्माण होवु नये म्हणून तसेच प्रशासनास सहकार्य म्हणून स्काऊट गाईड राज्य व राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या व्हर्च्युअल नियोजन सभेत ठरल्यानुसार सर्व स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयात मास्क बॅंक स्थापन तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व स्काऊट, गाईड, रोव्हर, रेंजर व युनिट लिडर यांनी प्रत्येकी 10 मास्क स्वत: तयार करुन स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयातील मास्क बॅंकेत जमा करावयाचे आहेत. जमा होणो मास्क स्थानिक प्रशासन व गरजुंना पुरविण्यात येत आहेत. जिल्हा कार्यालयात मास्कची आवक व वितरणाबाबत नोंदी ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्काऊट, गाईड, रोव्हर, रेजंर व युनिट लिडर यांनी प्रत्येकी 10 मास्क तयार करुन जिल्हा संस्थेस जमा करुन हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.
जी. जे. भोर , जिल्हा स्काऊट संघटक, नगर , संपर्क : 9403940177.
किती किती ब्रिलियंट आणि स्मार्ट बेटा कोरोना
नववर्षाचं स्वागत होताच फसवलस ना आम्हाला
अजिबात वेळ नाही असं म्हणणाऱ्यांना तू.
दिलीस विविध छंद जोपासण्याची अपूर्वाई..
आणि सर्व समाजाच्या मनमंदिरी
वाजविली अध्यात्मिक भावनेची शहनाई…
करोना, अगदी खरं सांगू.. तू आहेस खूप खूप महान.
आमच्यासह आमच्या बछड्यांनाही, तू दिलेस विश्वव्यापी ज्ञान
जनता जनार्दनाला दाखविलास, तू योग्य संस्काराचा दीपस्तंभ..
जनताही नतमस्तक झालील, घेऊन तुझ्या शिस्तीचा आधारस्तंभ..
परंतु खरं सांगू करोना, दिसतय ना आम्हाला
तू देखील थकला आहेस, जनता जनार्दन शिथिल होऊ नये,
म्हणून खूप खूप खपला आहेस..
वचन देतो आम्ही तुला, अगदी खरं!!
आम्ही नाही उतरनार मातनार,
आम्ही सर्वजण तुझ्यामुळे झालेले
संस्कार अखंड अखंड पाळणार
जाशील लवकर तू, तर संस्काराचा मेरू
सांभाळताना लोक तुलाच आठवतील..
जा-जा-जा बाबा लवकर तू,
तुझ्यासाठी परमेश्वर मोक्षाचे दार उघडतील…
निघतोस ना आता? आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत
तुला बाय म्हणण्यासाठी, लॉकडाऊनमधून बाहेर येत आहोत
निघ-निघ-निघ रे, आता परत न येण्यासाठी,
तुझे जीव नसणारे अस्तित्व, कायम नष्ट करण्यासाठी…
प्रा. सुरेखा अशोक जोगदे , संचालक तारांगण, नगर. संपर्क : 9604726091