उत्तम पिंगळे
(सूर्यनारायणाच्या प्रासादामध्ये सूर्यनारायण निवांत बसलेले आहेत व नारदमुनी अवतीर्ण होतात.)
सूर्यदेव : यावे मुनीवर, आज अचानक माझ्या महाली कसे आगमन?
नारदमुनी : नारायण, नारायण… यावे लागले. आपल्याला थोडी पृथ्वीतलावरची माहिती देणे आवश्यक वाटले.
सूर्यदेव : आपण प्रथम आसन ग्रहण करावे. (नारदमुनी बसतात.)
नारदमुनी : आपण येथे निवांत बसले आहात आणि जम्बुद्विपामध्ये आपल्या नावाने प्रार्थना सुरू आहे.
सूर्यदेव : मग मी काय करावे मुनीवर?
नारदमुनी : नारायण… नारायण… या जम्बुद्विपातील लोकांना वाटत आहे की, परवा जे ग्रहण तुम्हाला लागले होते त्यामुळे तुमच्यापासून विशिष्ट किरणे पृथ्वीतलावर पडून तो विषाणू नष्ट पावेल, त्यासाठी प्रार्थना सुरू आहे.
सूर्यदेव : आपण म्हणता तशी काही विशिष्ट किरणे मी जरी टाकावयाची ठरवली तरी जम्बुद्विपावर सध्या वरुणराजाचे वास्तव्य असल्यामुळे पुढील चार महिने माझा प्रभाव कमी राहणार आहे. तसेच हा करोना पृथ्वी तलावरील मानवानेच निर्माण केलेला असून त्याच्या हातून तो निसटल्यामुळे पूर्ण पृथ्वीतलावर पसरला आहे.
नारदमुनी : नारायण… नारायण… परंतु किती जणांचे प्राण जात आहेत. आपण पाहात आहात. तसेच चित्रगुप्ताचेही काम वाढले आहे. त्याला कित्येकांच्या पाप-पुण्याचा हिशेब लावावा लागत आहे.
सूर्यदेव : क्षमा करा मुनीवर, परंतु चित्रगुप्ताचे काहीही काम वाढलेले नाही, उलट त्याला आराम आहे.
नारदमुनी : नारायण… नारायण… अहो, जम्बुद्विपामध्ये आता या मृत्यूने पंधरा हजारांवर आकडा पार केला आणि तुम्ही म्हणता चित्रगुप्तास काम नाही?
सूर्यदेव : मुनीवर, अजूनही मी ठाम आहे याचे कारण आता तुम्हाला सांगतो. गेल्या चार-सहा महिन्यांमध्ये करोनामुळे पंधरा हजार मृत्यू जम्बुद्विपामध्ये झालेले आहेत. पण मी आपणास सांगू इच्छितो की, एका वर्षांपूर्वी जेव्हा सर्व सुरळीत होते तेव्हा जम्बुद्विपामध्ये केवळ रस्ते अपघातात वर्षभरात दीड लाख मृत्यू होत होते. म्हणजे महिना बारा हजारांपेक्षा जास्त. त्यावेळी चित्रगुप्ताला किती काम असेल. तेही आयत्यावेळी हे लक्षात घ्यावे म्हणूनच मी म्हणतो की, त्याला सध्या आराम आहे.
नारदमुनी : नारायण… नारायण… आपण अगदी योग्य माहिती दिली, माझ्या हे लक्षातच आले नाही.
सूर्यदेव : तेच म्हणतो मी मुनीवर, आपण पृथ्वी तलावर जाऊन कसेही करून लोकजागृती करावी. जेणेकरून या विषाणूशी कसे लढावे ते लोकांस समजेल. सर्वांनी आपापली काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
नारदमुनी : नारायण… नारायण… आपण अगदी योग्य माहिती दिली. रस्ते अपघातांमध्ये हजारांवर मृत्यू होत असूनही लोक काळजी घेत नव्हते. त्या मानाने या विषाणूचा मृत्यूदर कमी आहे. मात्र, तरीही लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मला अवनीतलावर पुन्हा आता लोकजागृती करण्याकरता निघावे लागेल. येतो मी. नारायण… नारायण…
(नारदमुनी सूर्यनारायणाचा निरोप घेऊन जम्बुद्विपाकडे प्रयाण करतात.)