Nagar Pune Highway – नगर–पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेले जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे व सचिन शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. जिल्हा प्रशासनाने महामार्गाच्या दुरुस्ती व सुरक्षिततेच्या कामांना गती दिली आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक, अरुंद रस्ता, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साईडपट्टीची दुरवस्था, तुटलेले डिव्हायडर तसेच नारायणगव्हाण चौपदरीकरणाचे प्रलंबित काम या विविध प्रश्नांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी व संबंधित विभागांनी महामार्ग दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते तसेच भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक संजय कुंभार यांचे स्वागत करण्यात आले. नारायणगव्हाण चौपदरीकरणाच्या उर्वरित कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रांताधिकारी चिंचकर यांना दूरध्वनीद्वारे तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. भूमिअभिलेख विभागाच्या संपामुळे संबंधित अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी नारायणगव्हाण चौपदरीकरणासह नगर–पुणे महामार्ग पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके व शरद पवळे यांनी सांगितले.