सातारा – करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना धावला आहे. गाळपास आलेल्या उसाची एफआरपीनुसार सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. एफआरपीनुसार सर्व रक्कम वेळेत देणारा अजिंक्यतारा हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे. आर्थिक मंदी व खरीप हंगामाची सुरुवात अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला असून कारखान्याने हंमागातील तिसरा प्रतिटन 140 रुपयांचा हप्ताही शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केला आहे.
अजिंक्यतारा कारखान्याने या गळीत हंगामात एफआरपीनुसार उसाला 2790 रुपये प्रतिटन दर दिला आहे. या हंगामात सहा लाख 12 हजार 917 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 12.84 टक्के विक्रमी उताऱ्याने 7 लाख 70 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. उसाला 2500 रुपये प्रतिटन पहिला आणि त्यानंतर 150 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता वेळेत देण्यात आला होता. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाइस चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व संचालक मंडळाने योग्य आर्थिक नियोजन केल्याने गाळपास आलेल्या उसासाठी एफआरपीतील उर्वरित 140 रुपये प्रतिटन, याप्रमाणे एकूण आठ कोटी 58 लाख 8 हजार 621 रुपये रक्कम सोमवारी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. मागील वर्षीही कारखान्याने एफआरपीनुसार संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली होती. त्यामुळे साखर आयुक्तांनी पत्राद्वारे कारखान्याचे कौतुक केले होते. या हंगामात कारखान्याच्या संचालक मंडळाने अनेक आव्हानांना तोंड देत एफआरपीची 100 टक्के रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.
सभासदांना सवलतीच्या दरात हॅंड सॅनिटायझर
करोनाच्या संकटात सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात हॅंड सॅनिटायझर पुरवण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. 200 मिली सॅनिटायझर सभासदांसाठी 35 रुपये तर संस्था, शाळा, ग्रामपंचायतींसाठी 45 रुपये, 500 मिलीची बाटली सभासदांसाठी 70 तर इतर संस्थांसाठी 80 रुपये, एक लिटर सॅनिटायझर सभासदांना 120 रुपये तर इतर संस्थांसाठी 150 आणि पाच लिटरचा कॅन सभासदांना 600 रुपये तर इतर संस्थांना 725 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.