अध्यक्षांसह बांधकाम सभापती स्वगृहीच का? झेडपीचे सत्ता समीकरणदेखील बदलले
नगर – अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांचे घनिष्ठ निकटवर्तीय व जिल्हा परिषदेचे किंगमेकर अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे आज मुंबई पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहूनही ते प्रवेशापासून दूरच राहिले. पिचडांचे सर्व सहकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याबरोबरच भाजपमध्ये प्रवेश केला.परंतु वाकचौरे लांब राहिले. अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे व वाकचौरे यांचे नेते भाजपवासी झाले तरी हे दोघेही अद्यापही स्वगृहीच राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडून अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहे. भाजपचे इनकमिंग जोरात सुरू आहे. नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र खा. डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक निकालानंतर मंत्री विखेंनी देखील प्रवेश केला.आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित माजीमंत्री मधुकर पिचड व त्याचे पुत्र वैभव यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. त्यावेळी पिचड यांच्या अनेक निकटवर्तीयांनी आपल्या नेत्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु जिल्हा परिषदेचे किंगमेकर वाकचौरे यांनी प्रवेशापासून दूर राहणे पसंत केल्याचे आढळून आले.
अर्थात जिल्हा परिषदेच्या सत्तेचे समिकरण देखील पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे बदलले आहे. विखेंनी पिचडांचा भाजप प्रवेश करून पुन्हा एकदा आपला खुंटा बळकट केला आहे. आज जिल्हा परिषदेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता असली तरी ही सत्ता काही तांत्रिक कारणामुळे. विखेंच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेस आघाडीची जिल्हा परिषदेतील सत्ता कधीच संपुष्ठात आली आहे. त्यात आता पिचड यांच्या प्रवेशामुळे त्यांचे दोन जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपवासीच होणार यात काही शंका नाही.
अध्यक्षा विखे यांच्यासह सभापती वाकचौरे हे दोघेही सध्या तांत्रिक दृष्ट्या स्वगृहीच वाटत असले तरी प्रत्यक्षात मनाने ते आता भाजपमध्ये आहे. परंतु सध्या तरी ते जिल्हा परिषदेचे सत्तेचे समिकरण बदलण्याची चिन्हे नाही. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. त्या पदाधिकाऱ्यांना मुदत वाढ मिळाली तर ते डिसेंबरपर्यंत पदावर राहतील. त्यानंतर खऱ्या अर्थाने सत्तेचे समिकरण बदल्याची चिन्हे आहेत. सध्या तरी भाजपचा जिल्हा परिषदेत वरचष्मा झाला आहे. परिणामी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला संख्याबळ कमी झाले आहे. सत्तातंर होणार असले तरी चेहरे मात्र देत राहण्याची शक्यता आहे.