नगर – हजारो युवक जिल्हा परिषदेच्या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या भरती प्रक्रियेवर सुरू होता होता पुन्हा थांबल्याचे दिसत आहे. सध्या राज्यात होत असलेल्या राजकीय घडमोडींचे सावट या भरती प्रक्रियेवर आले आहे. जिल्हा परिषद भरतीचे जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे 1 ते 7 मे दरम्यान जाहीर प्रसिद्ध होणार होती. मात्र, आठवडा संपत आलेला असताना देखील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य शासनाकडून 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र करोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार देखील झाला आहे. यानंतर, जिल्हा परिषदेची भरती 1 ते 7 मे दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू होईल, असे संकेत दिले होते.
तसेच या भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार महिने लागणार असून, तसेच या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वेळापत्रक प्रसिद्धीचा इच्छुकांना प्रतिक्षा लागलेली आहे. परंतु, 5 मे उजाडून देखील वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यातच 16 आमदारांच्या अपात्रतेची अंतिम सुनावणी ही 10 मे दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यानंतर, राज्यात सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. या जर-तर च्या चर्चेचा परिणाम भरतीवर होत असल्याचे बोलले जात आहे. यातच वेळापत्रक देखील जाहीर होत नसल्याने घालमेल वाढली आहे.