पुणे -“जशी मद्यपी व्यक्तीला झिंग आल्यावर तो घरातील वस्तू विकतो. तसे केंद्र सरकारचे झाले आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकायला निघाले आहे,’ अशा कडक शब्दांत वंचित बहूजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
देशाचा महसूल 19 लाख कोटींचा आहे. त्याच खर्च 35 लाख कोटी असून 27 कोटींची तूट आहे. सरकार सांगतेय की आमची मालमत्ता विकणार आहे. जर अशाप्रकारे कंपन्या विकल्या, तर सरकारकडे गॅरंटी देण्यासारखे काहीही शिल्लक राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार भवन येथे गरीब मराठा समाज संवाद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण यासह विविध विषयांवर भाष्य केले.
एल्गार परिषदेबाबत डॉ. आंबेडकर म्हणाले, “एल्गार परिषदेतेतील भाषण समोर आलेले नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. अगोदरची एल्गार परिषद समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी स्थापली होती आणि मी अध्यक्ष असतानाच ती बरखास्त केली. त्यानंतरच्या एल्गार परिषदेशी आमचा संबंध उरलेला नाही. आताच्या एल्गार परिषदेला मी महत्त्व देत नाही.’
…राज्य सरकारने कृषी कायदा स्वीकारू नये
नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, राज्य सरकारने 2006 सालीच करार शेतीचा कायदा अस्तित्वात आणला आहे. राज्याने हा कायदा रद्द केला तर केंद्राला तो लागू करता येत नाही. राज्य सरकारने हा कायदा रद्द करावा, हीच आमची भूमिका असल्याचे ऍड. आंबेडकर यांनी सांगितले.