पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज शिक्षक दिनी एन.आर.लॉन्स येथे वितरण
नगर – प्राथमिक शिक्षकांच्या कारकिर्दीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची अंतिम यादी आज संध्याकाळी जाहीर करण्यात आली. शिक्षक दिनी उद्या,दि.5 रोजी सकाळी 11 वाजता पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते व विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण नगर-औरंगाबाद रोडवरील एन.आर.लॉन्स येथे होणार आहे.कार्यक्रमाचे उदघाटन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे :
अकोले तालुक्यातून रामनाथ हौशीराम वाकचौरे, संगमनेर तालुक्यातून ज्ञानेश्वर पंढरीनाथ फटांगरे, कोपरगाव तालुक्यातून ज्ञानेश्वर पांडुरंग सौदाणे, राहाता तालुक्यातून शिवाजी पाराजी गायकवाड, राहुरी तालुक्यातून विजय सुधाकर कदम, नेवासा तालुक्यातील मनीषा एकनाथ लबडे, शेवगाव तालुक्यातून रोहिणी प्रभाकर साबळे, जामखेड तालुक्यातून काकासाहेब अर्जुन कुमटकर, कर्जत तालुक्यामधून श्रीमती छाया भानुदास मुन्ने, श्रीगोंदा तालुक्यामधून ताईबाई तुकाराम पवार, पारनेर तालुक्यामधून बाळू रेवजी शिंगोटे, नगर तालुक्यामधून वैजनाथ विलास धामणे, श्रीरामपूर तालुक्यातून राजेंद्र अण्णासाहेब पंडित, पाथर्डी तालक्यातून शैलैश संपतराव ढमाळ यांचा समावेश आहे. केंद्रप्रमुख संवर्गातून शिंगवे तुकाईचे केंद्रप्रमुख अशोक घाडगे व जेऊरच्या आशा तुकाराम फणसे यांचा समावेश आहे. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांची काल सकाळी 25 गुणांची जिल्हा परिषदेत परीक्षा घेण्यात आली होती.
ही परीक्षा झाल्यानंतर लगेच तालुका पातळीवरून पडताळणी होऊन आलेल्या शिक्षकांचे गोपनीय 100 पैकी मिळालेले गुण आणि परीक्षेत मिळालेले 25 पैकी गुण एकत्र करून पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे अंतिम करून ती मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता खबरदारी म्हणून अंतिम यादी अधिकृतरित्या आज उशिरा जाहीर करण्यात आली.जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी 5 सप्टेंबरला प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाला जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील एक असे 14 शिक्षक व दोन केंद्रप्रमुख निवडण्यात आले.
जिल्हा पातळीवर पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे अंतिम करण्यासाठी जिल्हा समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता. या समितीच्या मान्यतेनंतर पुरस्कारार्थी शिक्षकांचे नाव अंतिम करण्यात आली. शिक्षक पुरस्कारांच्या या निवडीसाठी मागील वर्षीपासून विशेष प्रक्रिया राबविली जात आहे.
मागील वर्षी या पुरस्कार निवडीत प्रचंड गोंधळ झाला होता.पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील शिक्षकांना हा पुरस्कार मिळावा यासाठी जोरदार लॉबिग केले.अनेक शिक्षक परीक्षेसाठी अनुपस्थित असतानाही त्यांना जास्त गुण देत निवडण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. आपल्या मर्जीतील ओळखीचा व नातेवाईक शिक्षकांना जादा गुणदान देवून निवडण्यात आल्याचा आरोप अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने व पदाधिकाऱ्यांनी या पुरस्कार निवडीचे अधिकार विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ढकलेले होते.