नगर : दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला आणि कल्पनाशक्तीला व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी आणि मराठे भाषेप्रती आत्मीयता वाढण्यासाठी सृजनात्मक लेखन क्षमता वाढीस लागावी या हेतूने यावर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन आयोजित केले आहे.
विद्यार्थी कवितावाचन हे केंद्र व तालुका आणि जिल्हास्तरावर अशा दोन गटात होईल. कविता हा अबालबृद्धांचा आवडता साहित्य प्रकार आहे. आपल्या सभोवतालच्या परिसरातील निसर्ग आणि भावजीवन, नातेवाईक, प्राणी, पक्षी इत्यादींना आपल्या कवितेचा विषय बनवणे शालेय विद्यार्थ्यांना आवडते. नवीन वस्तू, संगणक, आकाशातील तारे, ग्रह, सूर्य, चंद्र या सोबतच कल्पनाविश्वातील असंख्य विषय देखील त्यांच्या कवितेचे विषय बनतात. एकूणच अशा कवितेतून एक अनोखा खजिनाच खुला होतो.
कविता वाचन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी स्वतः लिहिलेलीच कविता वाचतील. विद्यार्थी ज्या कवितेचे वाचन करणार आहे ती कविता त्याने स्वतः लिहिलेली आहे. अशा प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थी /पालकाची स्वाक्षरी घेऊन ती प्रतिज्ञापत्रे शाळास्तरावर जतन करावीत. त्यासाठी विद्यार्थ्यांना कविता लेखनासाठी प्रोत्साहन द्यावे. आवश्यक ते मार्गदर्शन करावे, सरावही घ्यावा. त्यामुळे विद्यार्थी आपापल्या वयोगटानुसार व अनुभवानुसार कविता लेखन करतील व त्या कवितेचे वाचन करतील.
केंद्रस्तर गटवार कवितावाचन घ्यावे नंतर तालुकास्तरीय विद्यार्थी कवितावाचन हे 26 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात यावे. तर केंद्रस्तरावरून प्रत्येक गटातील निवडलेल्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला तालुकास्तरीय विद्यार्थी कवितावाचन करीत सहभागी करावे.
तालुकास्तरीय विद्यार्थी कवितावाचन मधून निवडलेल्या प्रत्येक गटातील प्रभावी कवितावाचन करणाऱ्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांस मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय विद्यार्थी कवितावाचन करण्याकरिता निमंत्रित करण्यात येईल. पहिल्या गटात इयत्ता 1ली ते इयत्ता 5 वी,तर दुसऱ्या गटात इयत्ता 6 वी ते 8 वीचे विद्यार्थी सहभागी होतील,असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे.