पुणे : जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच प्रलंबित कामांची संख्या शून्यावर (झिरो पेंडन्सी) कशी येईल, याचा प्रयत्न करा. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकताच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. फडणवीस यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दुरदृष्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सविस्तर सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचना
– आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अपडेट करा
– माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या.
– संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करा
– शासकीय कार्यालयांची स्वच्छता करा
-अनावश्यक कागदपत्रे काढून टाका
– अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा