नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घेतल्यावर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास बीसीसीआयने युवराजसिंगला नकार दिल्याने त्याच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.
निवृत्तीचा निर्णय मागे घेत जर युवराज स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज होत असताना बीसीसीआयने त्याला पाठिंबा द्यायला हवा होता. नवोदीत खेळाडूंना युवराजसारख्या खेळाडूंकडून बहुमोल मार्गदर्शन मिळू शकते मात्र, बीसीसीआयने कोणतेही कारण न देता केवळ नियमावर बोट ठेवत ही निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
युवराज देशांतर्गत मानाची समजली जात असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळणार होता. या स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. पण बीसीसीआयने त्याचे पुनरागमनाचे स्वप्न उध्वस्त केले. जो खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळला आहे, त्याला पुन्हा भारतामध्ये क्रिकेट खेळता येणार नाही. युवराजला यापुढे आयपीएलही खेळता येणार नाही, असे बीसीसीआयने युवराजला सांगितले होते.
जर युवराजला खेळण्याची संधी दिली तर युवा खेळाडूंना त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. बीसीसीआयने निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी द्यायला हवी. कारण यामुळे अनुभवी खेळाडूबरोबर खेळण्याची संधी युवा खेळाडूंना मिळेल आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण युवा खेळाडूंना अनुभवी क्रिकेटपटूंपासून बरेच काही शिकता येऊ शकते. पण याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार नक्कीच बीसीसीआयला आहे. मात्र, एखाद्या खेळाडूला पुनरागमन करण्याची इच्छा असेल तर त्याला ही संधी दिली जावी, असेही युवराजचे वडिल व माजी कसोटीपटू योगराजसिंग यांनी म्हटले आहे.
युवराजने 10 जून 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचवेळी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही असे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने पुन्हा क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर केले. या महिन्यात सुरु होत असलेल्या मुश्ताक अली स्पर्धेत युवराजला खेळायचे होते. पण बीसीसीआयने राज्य संघात त्याच्या निवडीला परवानगी नाकारली.