आ. चव्हाणांच्या हॅट्ट्रिकमुळे आमच्या कार्याला पसंती असल्याचे सिद्ध
फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आ. दीपक चव्हाण यांना सलग तिसऱ्यांदा विजयी केल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत. या निवडणुकीत तरुणांनी ठोस भूमिका घेतली होती. त्याचा विचार करता आगामी काळात तरुण नेतृत्व पुढे आणण्याचा विचार असल्याचे रामराजे यांनी म्हटले आहे.
तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवल्यानंतर फलटण आणि कोरेगाव तालुक्यांमध्ये कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी व औद्योगिक रचनेचे नियोजन करण्याची जबाबदारी आ. दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या हातात देण्यात येईल. आगामी काळात फलटण तालुका 100 टक्के बागायत होणार आहे. या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील भागाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन रामराजे यांनी केले.
फलटण शहर व तालुक्यात गेल्या 25/30 वर्षांत सर्वांना विश्वासात घेऊन काम केले. विकासकामांचे नियोजन व जनतेचे प्रश्न सोडवण्यात आम्ही कधीही कमी पडत नाही, हे या निकालाने स्पष्ट झाले आहे. शेजारच्या तालुक्यातून येथे येऊन हस्तक्षेप करण्याचा, येथील राजकारण व समाजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा कोणाचाही प्रयत्न जनता नाकारते, हेदेखील स्पष्ट झाल्याने त्या मंडळींनी यापुढेही आपली मर्यादा सांभाळावी. या मतदारसंघाचा कल पाहता, केवळ विरोधासाठी विरोध न करता तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि तरुणांना संधी देण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा रामराजे यांनी व्यक्त केली.
या तालुक्यातील जनतेने 1995 पासून आपल्याला सतत पाठिंबा दिला आहे. 1995, 1999 व 2004 या निवडणुकांमध्ये माझी हॅटट्रिक झाल्यानंतर 2009 पासून दीपक चव्हाण यांनीही सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राजे गटाच्या कार्यपद्धतीवर मतदारांनी पसंतीची मोहोर उठवली आहे. फलटणबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मतदारांनी शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांना साथ दिली आहे. त्यांच्या विचारांवर यापुढेही संपूर्ण सातारा जिल्हा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही रामराजे म्हणाले.