डॉ. कुमार सप्तर्षी यांचे प्रतिपादन
सातारा – लोकशाही राष्ट्रात माणसांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असते पण आजही माणसांना आपण सुरक्षित आहोत याबाबत खात्री नाही. ही बाब लोकशाहीला घातक असून अशा विचारांच्या शक्तीला आवरण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी पुढे येऊन ही जबाबदारी स्विकारायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत, राजकीय स्तंभलेखक व युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
जकातवाडी येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने अयोजित कार्यक्रमामध्ये युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
समाजकार्य महाविद्यालयाच्या रौप्य मोहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी यशवंतराव चव्हाण समाजकार्य विद्यार्थी हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यात पोहोचले असल्याचा अभिमान असल्याचे सांगून समाजातील प्रश्न समजावून घेणे व ते सोडवण्याकरिता अथक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाकरिता प्राचार्य आर. डी. गायकवाड उपस्थित होते. त्यांनीदेखील विद्यार्थ्यांना उत्तम विद्यार्थी होण्याकरिता मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेच्या संचालिका शशीताई माने, प्रभारी कार्याध्यक्ष भाईशैलेंद्र माने, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाली जोसेफ, समाजकल्याण विभाग निरीक्षक प्रशांत हेळकर, सहाय्यक रेळेकर उपस्थित होते. प्रास्ताविक भाईशैलेंद्र माने यांनी केले. आभार प्रा. जीवन बोराटे यांनी मानले.