वाघोली – राजकारण व समाजकारणात युवकांनी सहभाग घेत आपले वेगळेपण निर्माण करून सामाजिक जाणीव लक्षात ठेवून कार्यरत राहणे आजच्या काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व या हेतूने राजकारण व समाज कारणाशी आपली नाळ जोडावी असे आवाहन राज्यातील युवकांना महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांनी केले आहे.
पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विक्रांत दादा पाटील बोलत होते. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे,सुशील मेंगडे, सुदर्शन पाटसकर,विजय हरगुडे, पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप सातव, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सचिव भैरवी वाघ, आदी तालुका व जिल्हा भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या वतीने तळागाळातील कार्यकर्त्यांना युवा वारियर नावाची संघटनात्मक संकल्पना राबवून समाजकारण व राजकारणाला युवावर्गाला जोडण्याची अनमोल संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधी च्या माध्यमातून तरुणांनी भाजपची ध्येय धोरणे सर्व समाजातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.