अमरावती : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे. मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत. युवकांचा आय.क्यु. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असतांना आमचे युवक सोशल मिडीयाचा जास्तीतजास्त वापर करीत असून त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात, असे आवाहनात्मक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षात शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन दि. 22 एप्रिल ते 25 एप्रिल, 2022 दरम्यान ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती याठिकाणी करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
उद्घाटन झाल्याची घोषणा करुन मार्गदर्शन करतांना मंत्री सुनिल केदार म्हणाले, नवीन पिढीचा आय.क्यु. जास्त आहे. भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे. तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून त्याचा जास्तीतजास्त वापर आपल्या देशात होत आहे. परंतू आमचा युवक वर्ग सहा ते सात तास वेळ फेसबुक व व्हाट्सअॅप वर खर्ची घालतो, त्यातल्या त्यात यामध्ये मध्यम वर्गातील विद्यार्थी बळी पडत असून युवकांनी जागृत होवून सोशल मीडीयाच्या वापरावर मर्यादा ठेवावी आणि आपल्यातील असलेल्या कलाकौशल्यांना वृद्धींगत करण्याकरिता अधिकाधिक वेळ द्यावा.
विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, विदेशात क्रीडा कौशल्याला अधिक महत्व दिले जाते. महाराष्ट्रात देखील स्थापन झालेल्या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून मैदानी खेळांसह इतर कलाप्रकारांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. त्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असण्यावर भर दिला जाईल, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी सर्व कलावंत विद्याथ्र्यांना आपल्या कला उत्कृष्टरितीने सादर करण्याकरिता व विजेता होण्याकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्यात.