नवी दिल्ली- रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात युवक कॉंग्रेस तर्फे आज येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. रायसीना मार्गावरील युवक कॉंग्रेस मुख्यालयातून रेलभवनावर या कार्यकर्त्यांनी शर्ट न घालता मोर्चा काढला पण पोलिसांनी तो मध्येच अडवला. देशातल्या 109 मार्गावरील 151 गाड्या खासगी कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरूवात होणार होती त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला होता.
या संबंधात युवक कॉंग्रेसतर्फे जे निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की सन 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांनी अनेक सरकारी कंपन्या विकून त्यांचे खासगीकरण केले आहे. रेल्वेची सेवा सर्वसामान्यांच्या सोयीची सेवा आहे, खासगीकरणातून ही सेवा कंपन्यांच्या मर्जीवर चालेल आणि त्यातून लोकांची लूट होईल असा आरोप त्यांनी केला.