काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध माणसाचे दूरदर्शनवरून भ्रष्ट मार्गाने पैसे स्वीकारतानाचे दृश्य दाखवले. नंतर पत्रकांनी त्यांना यासंबंधी प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, “”पैसा म्हणजे परमेश्वर नाही. पण परमेश्वराखालोखाल मी पैशाला मानतो.” त्यांचे हे अजब तत्त्वज्ञान ऐकून लोक थक्क झाले. तर असा हा पैसा! सर्वांना हवाहवासा वाटणारा. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची काहींची तयारी असते. अगदी विश्वासाची रेशीम नाती तोडण्याचीही. आता रावसाहेबांच्या घरचे हे उदाहरणच पाहा ना! रावसाहेब एका तीर्थक्षेत्राच्या गावी राहत होते. त्यांना तीन मुलं. थोरली वनिता, दुसरा अरुण आणि तिसरा बबन. पुढं मुलं मोठी झाली. त्यांचे विवाह झाले. मात्र वनिताच्या सासरी परिस्थिती बेताची असल्यामुळे ती माहेरी येऊन राहिली. तीनही मुलांचे संसार बऱ्यापैकी चालले होते. पारंपरिक व्यवसायात ते रमले होते.
पुढे रावसाहेबांचे निधन झाले. पाठोपाठ त्यांच्या पत्नीचेही निधन जाले. मात्र ही तीन भावंडे एकत्र राहत होती. जागा पुरी पडत होती तरीही तिघांचा संसार एकत्रच होता. वनिता, अरुण आणि बबन यांची मुलेही मोठी होऊ लागली. घरात डझनभर माणसे झाली. तेव्हा आता मोठे घर बांधले पाहिजे असा निश्चय झाला. त्यासाठी गावाकडच्या जमिनीचा एक तुकडा विकण्याचे ठरले. वडिलांच्या निधनानंतर या तिघा भावंडांची नावे सातबाऱ्याला लागली होती.
धाकट्या बबनकडे जमिनीला गिऱ्हाईक बघणे, त्या पैशात घर बांधून घेणे ही जबाबदारी देण्यात आली. मग बबनही कामाला लागला. त्याने एक गिऱ्हाईक शोधले. जमिनीचा व्यवहार पूर्ण झाला. प्रत्येक भावंडाच्या नावे प्रत्येकी सात लाख रुपयांचा चेक निघाला हे सर्व पैसे इकडे तिकडे खर्च होऊ नयेत म्हणून त्याने एक टूम काढली. बबन थोरल्या वनिताला व अरुणला म्हणाला,
“”आपण बॅंकेत एकत्र खाते उघडू. त्यात सर्व पैसे ठेवू, म्हणजेच पैसे इकडे तिकडे जाणार नाहीत.” सर्वांनी बबनचे म्हणणे मान्य केले. त्याप्रमाणे गावातील बॅंकेत संयुक्त खाते उघडून त्यात चेक भरले. त्या गावातच त्यांच्या वडिलांनी दोन गुंठ्याचा प्लॉट पूर्वीच घेऊन ठेवला होता. त्या प्लॉटवर तीन मजली घर बांधायचे ठरले. तिघांना तीन स्वतंत्र फ्लॅट, अशी ती योजना होती. सर्व जबाबदारी बबनवर सोपवली होती. त्याने प्लॉटची मोजणी करून घ्यायची, घराचा प्लॅन काढायचा, तो नगरपालिकेतून मंजूर करून घ्यायचा व बॅंकेत ठेवलेल्या पैशांतून घर बांधायचे असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे बबन कामाला लागला. मात्र, सहा महिने झाले तरी काहीच हालचाल दिसेना. घर बांधण्याची प्रक्रिया वेग घेईना. तेव्हा वनिताने बबनला विचारले,
“”अरे बबन, घर बांधायचं काय झालं?” त्यावर बबन म्हणाला, “”प्लॉट मोजणीला अर्ज टाकलाय. घर बांधणं तुम्हाला सोपं वाटलं काय?” त्यात किती कटकटी असतात, त्या माझी मलाच माहिती जिथं तिथं हात ओला करावा लागतो.”
बबनच्या या उत्तरावर सारे गप्प बसले. मात्र, पुन्हा सहा महिने झाले तरी कसलीच प्रगती दिसेना. मग अरुणने बबनला विचारले, “”अरे बबन, प्लॉट मोजणीचे काम झाले का?” “”होईल एवढ्या दोन महिन्यात. त्यानंतर झक्कास प्लॅन काढून घेतो. प्लॅन मंजूर झाला की लगेच कामाला सुरुवात.”
पुन्हा सर्वांनी बबनवर विश्वास ठेवला. मात्र, त्यानंतर वनिता व अरुण यांना बबनची शंका येऊ लागली. त्यांनी प्रत्यक्ष मोजणी कार्यालयात जाऊन चौकशी केली. तर तेथील अधिकारी म्हणाले, “”तुमचा मोजणीचा अर्जच आमच्या कार्यालयात आला नाही.” नंतर वनिता व अरुण आर्किटेक्टकडे गेले. प्लॅनचे काम कुठवर आलेय याची चौकशी केली. तर आर्किटेक्चर साहेब म्हणाले, “”तुमच्या घराचा प्लान काढण्याचे काम मला कुणी दिलेच नाही; तर प्लान कसला काढू?”
त्यानंतर वनिता व अरुण या दोघांना बबनची जास्तच शंका येऊ लागली. हा घराचे काम करण्याऐवजी दिवस ढकलण्याचे काम करतोय हे त्यांच्या लक्षात आले. यावर गोष्टीत दोन वर्षं गेली. बबन उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. म्हणून वनिता व अरुण बॅंकेत गेले. त्यांनी बॅंकेत ठेवलेल्या पैशांची चौकशी केली. खात्यावर किती पैसे आहेत हे जाणून घेतले. तर बॅंक मॅनेजर म्हणाले, “”तुमच्या संयुक्त खात्यावर 21 लाख रुपये होते; पण बबनने वेळोवेळी त्यातील पैसे काढून घेतले. आता खात्यावर फक्त बत्तीसशे रुपये आहेत.”
हे सर्व ऐकून वनिता व अरुणला मानसिक धक्काच बसला. त्यांनी मॅनेजरकडे तक्रार केली की, “”तुम्ही बबनला एकट्याला पैसे का दिले?” त्यावर मॅनेजरसाहेब म्हणाले, “”तुमचे खाते संयुक्त होते ही गोष्ट खरी आहे; पण पैसे काढण्याचे अधिकार तुम्ही बबनला दिले होते. तुम्ही तशा सह्या केल्यात.” हे ऐकून वनिताच्या आणि अरुणच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण फसवले गेलो याची त्यांना जाणीव झाली. आपला विश्वासघात झाला याचा त्यांना धक्का बसला. पैशाच्या मोहापायी नाती तुटली होती. घर उभे रहायच्या ऐवजी उद्ध्वस्त झाले होते. साऱ्या घरादाराचे नवीन घर बांधण्याचे स्वप्न भंगले होते. म्हणतात ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ. दाद कुणाकडे मागायची?
– डॉ. दिलीप गरूड