स्वदेशी अॅप विकसनासाठी आत्मनिर्भर भारत अॅप चॅलेंज
नवी दिल्ली – अॅप निर्मिती क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा, याकरिता माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मोहिमेच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारत इनाव्हेशन चॅलेंज जाहीर केले आहे. यामध्ये भारतातील स्टार्टअप् आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत तरुणांनी सहभागी व्हावे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ही मोहीम मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
परदेशात तयार झालेले अॅप आपण वापरले तर आपली माहिती परदेशात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे या क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने चीनमधून नियंत्रित केल्या जाणाऱ्या 59 अॅपवर नुकतीच बंदी घातली आहे त्यामुळे तरुणांचा काही प्रमाणात हिरमोड झाला असला तरी या संधीचा फायदा घेऊन भारतातील तंत्रज्ञान आणि स्टार्ट क्षेत्रातील तरुणांनी स्वदेशी अॅप विकसित करावी, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत संकल्पना जाहीर करण्यात आलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि कार्यक्षमता वाढवून आपली उत्पादने निर्यात केली पाहिजेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. लेट अस कोड फॉर आत्मनिर्भर भारत असे प्रसाद यांनी भारतातील तरुणांना सांगितले.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक दर्जाचे आहे. या क्षेत्रात भारत केवळ स्वयंपूर्ण नाही तर भारत सॉफ्टवेअरची निर्यात करतो. त्यामुळे संगणक आणि मोबाइलसाठी अॅप विकसित करणे भारताला अवघड नाही, असे समजले जाते.
मात्र, आतापर्यंत परिस्थितिजन्य कारणामुळे भारत अॅप निर्मितीला प्राधान्य देत नव्हता. आता मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. या क्षेत्रामध्ये प्रचंड वाव आहे. भारतात अॅप विकसित केली जातात. त्यांचा आवाका आणि व्याप्ती कमी आहे. हा आवाका आणि व्याप्ती वाढविण्याची वेळ आली आहे. सरकार यासाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण निर्मिती करणार आहे. ई-लर्निंग, वर्क फ्रॉम होम, गेमिंग, व्यापार, मनोरंजन, कार्यालयीन कामकाज, सोशल नेटवर्किंग इत्यादी क्षेत्रांत अॅप विकसित करण्यास प्रचंड वाव आहे. त्यासाठी सरकार माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि नॅसकॉमच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करणार आहे.
दोन पातळ्यांवर चॅलेंज…….
आत्मनिर्भर भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंज ही स्पर्धा भारतात दोन पातळ्यांवर घेण्यात येणार आहे. एक म्हणजे सध्या आहे ती अॅप वाढविणे आणि विकसित करणे. त्याचबरोबर दुसऱ्या वर्गात पूर्णतः नवीन अॅप विकसित करणे अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. आतापर्यंत या दोन्ही वर्गासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.