-अरुण गोखले
चातुर्मास सुरू झाला की त्याबरोबरच आपल्याकडे अनेक व्रतांचाही प्रारंभ होतो. उदाहरणार्थ, श्रावणी सोमवार, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, नागपंचमी, ऋषीपंचमी, हरितालिका इत्यादी.
एखाद्या व्रतासंदर्भात ते व्रत का करायचे, कशासाठी आणि कशाप्रकारे करायचे, ते केले असता त्याचे फळ काय? हे ज्या कहाणीतून प्रभावीपणे सांगितले जाते, त्यालाच “व्रताची कहाणी’ म्हणतात.
आपल्या संस्कृतीत मानवी मनातील श्रद्धा, भक्ती आणि ईश्वर निष्ठेस या कहाण्यांनीच खतपाणी घालून पिढ्यान्पिढ्या समृद्ध केलेले आहे. हा ज्ञानाचा, बोधाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असाच चालत आलेला आहे.
या कहाण्यांना मानवी जीवनात फार मोलाचे स्थान आहे. जी गोष्ट आपण दुसऱ्याच्या मनावर अन्य कोणत्याच माध्यामाने प्रभावीपणे पोहोचवू शकत नाही, तीच गोष्ट प्रभावी कथा किंवा कहाण्यांच्या मदतीने सहजपणे पोहोचविता येते. या व्रतांच्या छोटेखानी कहाण्याची लेखन पद्धतीही आगळीवेगळी अशीच आहे. या कथा/कहाण्या एका विशिष्ट अशा पद्धतीनेच सुरू होतात आणि त्यांचा शेवट हा सुद्धा विशिष्ट अशा पद्धतीने केलेला असतो.
साधारणपणे या कहाण्याच्या पुस्तकातील कहाणी वाचायला सुरुवात केली तर आपल्या असे लक्षात येईल की या व्रतकथांची सुरुवात ही- एका देवा तुमची कहाणी! आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता, अशी असते किंवा त्या नगरात एक गरीब ब्राह्मण राहात होता, अशी तरी असते. त्यानंतर त्या व्रताचे महत्त्व सांगणारी कथा ही सांगितलेली असते.
तसेच या कहाण्याचा शेवट हासुद्धा एका खास अशा पद्धतीनेच केलेला असतो. जसे की- ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण. तसेच काही कहाण्यांचा गोड असा शेवट करताना गोष्टीतील स्त्री-पुरुष यांना जशी ती देवता प्रसन्न झाली. त्यांची जशी मनोकामना पूर्ण झाली, त्यांना जशी सुख-शांती मिळाली तशी ती आपल्यालाही लाभो, अशी प्रार्थना केलेली असते.
या कहाण्यांना एक गोडवा असतो. नाद असतो, एक माधुर्य असते. कहाण्यांची वाक्यरचना ही साधीसोपी आणि सुटसुटीत असते. त्यांची वाक्यरचना छोट्या छोट्या असतात. कहाणी लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे या कथांमधला ओघ आणि शब्दांचे नाद माधुर्य असते. या कहाण्या मोठ्या श्रवणीय आणि त्यातील बोध हा आचरणीय असतो.